कामाचा आनंद, निष्ठा आणि संयम हाच यशाचा कानमंत्र —
आत्मनिर्भर शेतकरी निर्माण करण्यासाठी व बियाण्यांचा काळाबाजार संपविण्यासाठी जवळपास ३२ वर्षांपूर्वी समविचारी लोकांनी निर्मल भावनेने सुरु केलेली कंपनी म्हणजे आजची निर्मल सिड्स…! कडधान्य व भाजीपाला बियाण्याच्या क्षेत्रात अग्रगण्य नाव म्हणजे जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील निर्मल सिड्स ही कंपनी आणि या कंपनीच्या संस्थापक सदस्य स्व. आर. ओ. पाटील यांच्या सोबत कंपनीच्या जडणघडणमध्ये खांद्याला खांदा लावून प्रसंगी आपली वैद्यकीय कारकीर्द सोडून कंपनीच्या कामात सक्रीय झालेले डॉ. सुरेश पाटील यांनी त्यांचा हा प्रवास अॅग्रोवर्डच्या जळगांव कार्यालयातील ” भेट कृषी ऋषींची” या कार्यक्रमात उलगडला आहे.
कृषी परिवाराची कौटुंबीक पार्श्वभूमी लाभलेले डॉ. सुरेश पाटील यांचे चहार्डी (ता. चोपडा, जळगांव) मूळ गांव आहे. स्वतंत्रपूर्व काळातच त्यांच्या परिवारात १९३० साली पी.एच.डी धारक डॉ. विश्राम पाटील यांच्या रूपाने उच्च शिक्षणाचा वारसा लाभला होता. डॉ. विश्राम पाटील यांनी लंडन येथे उच्च शिक्षण घेतले होते व शहादा येथे वास्तव्य करून कृषी विषयक विविध प्रयोगांची मालिकाच त्यांनी सुरु केली. डॉ. सुरेश पाटील यांनी देखील वैद्यकीय शिक्षण घेत आपल्या घराण्याचा उच्च शिक्षणाचा वारसा सुरु ठेवला आणि तोच वारसा व वसा त्यांचा मुलगा व मुलगी यांनी आपआपल्या क्षेत्रात सामाजिक बंधीलकी जपत सुरु ठेवला आहे. डॉ. सुरेश पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे, जास्त उत्पादने देणारी बियाणे कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी तापी-नर्मदा अॅग्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशनची सुरुवात केली. कालांतराने त्यांचा हाच प्रोजेक्ट “निर्मल सीड्स” नावाने १९८८ साली कंपनी रुपात आला.
निर्मल सीड्सच का?
फक्त शेती, शेतकरी व कृषी उद्योगाचा विकास हा निर्मल उद्देश समोर ठेऊन आणि सर्व शेतकरी पुत्रांचा ग्रुप म्हणून हा निर्मल सीड्स समूह स्व. आर. ओ. पाटील (तात्यां) यांनी मित्रांच्या सहकार्याने उभा केला. निर्मल सीडस हे असे एक नाव आहे की जे कृषी क्षेत्रात शेती व शेतकऱ्यांच्या हितार्थ सतत अग्रेसर आहे. सुरुवातील फक्त पाचोरा ( जळगांव) येथे उभा रहिलेला हा प्रकल्प आज देशातील कान्याकोपऱ्यात २३ ठिकाणी कार्यालय व युनिटसह कार्यरत आहे. त्यात अकोला, जालना, नागपूर, पुणे, अहमदाबाद, इंदूर, जबलपूर, रायपूर, आग्रा, लखनऊ, जयपूर, जोधपूर, पटना, चंदीगड, हैदराबाद, कुरनूल, हुबळी, बेंगळुरू, त्रिची, भुवनेश्वर, गुवाहाटी, रांची आणि सिलीगुडी यांचा समावेश आहे. कंपनीतील सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, वितरक व हितचिंतक शेतकऱ्यांच्या ३२ वर्षाच्या पाठबळावर ही उपलब्धी मिळालीअसल्याचे सांगताना डॉ. पाटील यांचा चेहरा अभिमानाने फुलला होता.
गुणवत्तापूर्ण बियाणे हीच ओळख
फक्त संख्यात्मक धेय पूर्ण करण्यासाठी बियाणे विकून पैसा कमवायचा हा सध्याच्या मार्केटचा ट्रेड असतांना निर्मल सीडसने फक्त गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देण्याचा आपला उद्देश कधीही नजरेआड केला नाही. म्हणूनच त्यांच्या सोबत आजच्या आघाडीच्या नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बियाणे कंपन्यांनी काम केले आहे. बियाण्यांच्या काळाबाजाराच्या विरुद्ध उभी असलेली कंपनी म्हणजे निर्मल सीड्स अशी आजच्या घडीला कंपनीची ओळख त्यामुळेच निर्माण झाली आहे, हे सांगतानाच त्यांनी २० वर्षापूर्वीचे काही दाखले दिले. २० वर्षापूर्वी पुणे येथे कंपनीच्या बाजरीला प्रचंड मागणी होती. त्याकाळी वाढीव दराने देखील पैसे देण्याची शेतकऱ्यांची तयारी असतानांही केवळ शेतकरीहित लक्षात घेऊन पोलीस संरक्षणात संबंधित बियाण्यांचे वितरण कंपनीने करून घेतले होते. यावरून कंपनीच्या बियाण्यांची गुणवत्ता व परिणामी कंपनीची विश्वासार्हताही लक्षात येते, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले.
भूमीपुत्रांची कंपनी
बियाणे कंपनी सुरु केली त्यावेळी अनेक नामांकित कंपन्या कार्यरत होत्या आणि आम्ही सुरु केलेली कंपनी ही शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमीपुत्रांनी सुरु केलेली उत्तर महाराष्ट्रातील पहिली कंपनी होती. कोणालाही या क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव नव्हता. त्यामुळे साहजिकच अनेक अडचणी आल्या. या काळात आमच्यातीलच काहीजण कंपनी सोडून गेले. दरम्यान प्रचंड आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. परंतु आम्ही आमच्या उद्देशावर ठाम होतो. त्यामुळे प्रसंगी स्व:ताच्या घरातील बचतीची रक्कम सुद्धा कंपनीच्या कामासाठी वापरली. मात्र कोणत्याही परीस्थितीत आमचे ध्येय, मार्ग बदलला नाही. त्याचमुळे आजचा हा वटवृक्ष उभा राहिला असून आज २३ ठिकाणी त्याच्या पारंब्या रुजल्या व भारतभर त्याचा विस्तार होऊ शकला असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
यशाचा मंत्र
चिकाटी, निरंतर प्रयत्न, संयम हा आमच्या यशाचा खरा मंत्र आहे, असे सांगताना डॉ. पाटील आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या (R&D) लॅबचा आवर्जून उल्लेख करतात. निरंतर संशोधन व प्रगती यामुळेच आम्ही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलो, असेही त्यांनी सांगितले. भारतात बीटी बियाण्यांचा बोलबाला असतांना एका आंतरराष्ट्रीय कंपनीला या बियाण्याची जास्तीची रॉयल्टी द्यावी लागत होती. हा पैसा कंपनीच्या नव्हे तर आपल्याच शेतकरी बांधवांच्या खिशातून जात असल्याची बाब हेरून निर्मल सीडसने संबंधित विदेशी कंपनीचे बीटी बियाणे विक्री करण्यास ठाम नकार दिला. परंतु, दरम्यानच्या काळात आमच्या कंपनीने देशी वाण व सरळ वाण बाजारात आणून शेतकऱ्यांचा फायदा कायम राखला. कंपनीचे अंबिका ५ व १२ हे वाण अजूनही आपले महत्व राखून असल्याचे सांगताना त्यांच्या प्रत्येक वाक्यात अभिमान जाणवत होता.
देशात आजही कडधान्य बियाणे म्हटले की, शेतकऱ्यांच्या समोर फक्त निर्मल सीड्स हेच नाव येते, असे डॉ. पाटील यांनी आवर्जून स्पष्ट केले. भाजीपाला बियांच्या संशोधनासाठी कंपनी विविध आंतरराष्ट्रीय व भारतातील विविध संस्था, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्था( आय.सी.ए.आर.) व इतरही विद्यापिठांसोबत काम करीत आहे. मात्र केंद्र सरकारने भाजीपाला पिकातील बीटी बियाण्यांच्या संदर्भात अंतिम निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. यावर सकारत्मक निर्णय झाल्यास येणाऱ्या काळात भाजीपाल्यात बीटीचे विविध वाण उपलब्ध करून देणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढण्यास नक्कीच मदत होईल हेही त्यांनी प्रकर्षाने नमूद केले.
जमिनीच्या आरोग्यासाठी बायो-प्रोडक्टची सुरुवात
सतत रासायनिक खतांच्या व रासायनिक औषधांचा अतिरेक वापर यामुळे शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी या महाग औषधांच्या वापरामुळे अधिकच कर्जबाजारी होत असून आपल्या जमिनीची तसेच पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. ही बाब लक्षात घेत निर्मल सीडसने शेतकऱ्यांच्या हितार्थ जैविक किडनाशकांची निर्मिती सुरु केली असून, भारताच्या उत्तर पूर्व भागात त्यांची प्रचंड मागणी आहे.
डॉक्टर ते कंपनी संचालक
डॉ. पाटील यांना एक मुलगा असून तो कृषी क्षेत्रातच त्याने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तयार केले आहे. मुलगी देखील पुण्यात एका नामांकित संस्थेत (सी.ए.) कार्यरत आहे. डॉ. पाटील यांनी जवळपास २० वर्षे वैद्यकीय सेवा केली. त्यातील सुमारे १० वर्षे ते पुण्यातील एका सामाजिक संस्थेत सेवा देत होते. त्यांनतर त्यांनी हाच सामाजिक वारसा जपत जळगाव येथील शिवाजीनगर भागात आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. त्यांनतर कंपनीच्या वाढत्या व्यापामुळे १० वर्षांनंतर त्यांनी संबंधित व्यवसाय आपल्या सहकाऱ्याला सुपूर्त करून पूर्ण वेळ निर्मल सीडस या संस्थेसाठी स्वतःला वाहून घेतले.
... आणि आयुष्य बदलले
१९६९ साली वैद्यकीय पदवी घेतली. तेव्हा रुग्णसेवा हाच ध्यास व एक विलक्षण ओढ होती. कालांतराने पुढे निर्मल सीडसची स्थापना झाली आणि हाच खरा त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय ठरला आणि येथूनच खऱ्या अर्थाने आयुष्य बदलले. कोणतीही गोष्ट ठरवून केली नाही तर सर्व आपोआपच घडत गेले. मात्र जे केले व जेथे होतो त्या प्रत्येक ठिकाणी स्वतःची १०० % उपस्थिती व १००% च योगदान दिले. पण या घडामोडीत आपण शेतकरी हितार्थ काम करत असल्याचे एक मानसिक समाधान कायम लाभते, असे डॉ. पाटील सांगतात.
६९ वर्षीय डॉ . पाटील यांचा दिवस सकाळी ५.३० वाजता सुरु होतो. साधारण एक तास नियमित चालणे व नंतर एक तास योगा केल्यावर, एका कट्ट्यावर एकत्र जमून मित्रासह चहाच्या आस्वादाने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी १० वाजता कामानिम्मित कधी पाचोरा किंवा कधी चहार्डी येथील कंपनीच्या युनिटला भेट देणे असा शिरस्ता कायम आहे. या वयातही त्यांचा कंपनीच्या कामासाठी देशभरात कारद्वारे वर्षभरात सुमारे ७५ हजार किमी प्रवास होतो. रेल्वे व विमानाने होणारा प्रवास वेगळा. यावरून त्यांच्या उत्साह व स्फूर्तीची जाणीव होते. आपले काम करण्याचे क्षेत्र कोणतेही असले तरी कामाचा आनंद, कामाप्रती निष्ठा आणि संयम यागोष्टी असल्या तर नक्कीच यश मिळते, असा यशाचा कानमंत्र यावेळी डॉ. सुरेश पाटील यांनी दिला.
लॉकडाऊनमध्ये नात व पुस्तक वाचन
लॉकडाऊनच्या कार्यकाळात आमच्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगसह इतरही कामे ऑनलाइन अर्थात घरूनच करावी लागत आहेत. परिणामी इतक्या वर्षात प्रथमच सलग इतका काळ घरी रहावे लागण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे. घरात माझी छोटी नात असून लॉकडाऊनपूर्वी मी घरात अतिशय कमी रहात असल्याने तिच्यासाठी मी सर्वात शेवटची प्राथमिकता होतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर मी घरातच राहू लागल्याने मला नातीचा सहवास लाभला. आज तिच्या आईनंतर तिचे बाबा म्हणजे अर्थातच मी तिच्यासाठी दुसरी प्राथमिकता बनलोय. आजोबा व नातीच्या नात्यातील हळुवारपणा व प्रेम या दिवसात मला अनुभवता आले, हे सांगताना डॉ. पाटील काहीसे भावनाविवश झाले होते. लॉकडाऊनमध्ये पुस्तक वाचनाच्या छंदाचा देखील मी पुरपूर लाभ घेतल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भावी उज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा
निर्मल सिड्स ही कंपनी …… मराठी तरुणांनी.सुरू केलेली …. व्यापार शी कुटुंबाचा काही समध नसताना…….. पैसेच भरपुर पाठबळ नसताना हिमतीने सुरु केलेली कंपनी…… त्यावेळी बॅक सुध्दा मराठी तरुणांना ना कर्ज पुरवठा करत नव्हते……..एका विशिष्ट जातीला कर्ज मिळे
तरीही या जिगरबाज लोकांनी कंपनी सुरु करुन….नाव रुपाला आणली
पाचोरा सारखे ….प्रगती शुन्य गावात त्यावेळी कंपनी सुरु केली.
वैयक्तिक मी भेटलेलो नाही सुरेश सराना…..आर ओ तात्या ना भेटलो आहे.
तात्या लवकर सोडुन गेले…. सुरेश सराना . दिर्घ आयुष्य लाभो
Respected Dr.Saheb Suresh shamrao Patil is very talented, Hardworking, enthusiastic, optimistic, great attachment with people, honest person.I get lot of inspiration from Respected Dadasaheb Dr.suresh Patil.
अप्रतिम!!! वास्तव लेख,
माननीय दादा साहेब ,एक सच्चे भूमिपुत्र
व आजच्या भूमिपुत्र गरज ओळखून त्यांना या अस्मानी संकटातून मुक्त करण्यासाठी निर्मल विचाराने या निर्मल बियाणे निर्मितीतून कर्ज बाजारी शेतकऱ्यांना
संजीवक ठरले आहेत व फक्त नफा हा उद्धेश न बाळगता माझा शेतकरी लाखाचा पोशिंदा कसा कर्जमुक्त होणार हाच उद्देश दादा साहेबांच्या विचारातून दिसून येतो
दादा साहेबांच्या कार्याला त्रिवार सलाम!!!
Nice statement anout Devlopment and groth of nirmal seeds which is only one co who is farmerbase whatever researh done by co by that seed farmers increase their yield and there financial position They recently introduced micoriza which creats burshi in soil and it protects the plants from many soilborn diseases
खुप छान प्रेरणादायी यशोगाथा. लेखाची मांडणीही सुरेख आहे. नवउद्योजकांसाठी पथदर्शक. समाजसेवा व व्यवसाय यांचा सुरेख संगम. डॉ. निमाताई यांचेही योगदान महत्त्वाचे.