Home तांत्रिक खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज करा…

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज करा…

0
1

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी याची माहिती घेणे आवश्यक ठरते. मृत खातेदाराच्या वारसांची नोंद ज्यात घेतली जाते त्या नोंद वहीस गाव नमुना ६ क असे म्हणतात. वारस नोंदी प्रथम यामध्ये रजिस्टरमध्ये नोंदवून वारसाची चौकशी केली जाते नंतर कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे याबाबत वारस ठराव मंजूर केला जातो. नंतर नोंदवहीत परत फेरफार नोंद केली जाते. वारसाबाबत जर तक्रार असेल तर शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आवश्यक संधी मिळू शकते.

वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक बाबी

  • खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज देणे अपेक्षित असते.
  • अर्जात मृत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे. त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे. याची माहिती असते.
  • अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमिनीचे ८ अचे उतारे, सर्व वारसांचे पत्ते, वारसाचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते व शपथेवरील प्रतिज्ञा पत्र सादर केले पाहिजे.
  • नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात. हिंदू व्यक्तीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया

सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यू नंतर ३ महिन्यांच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.

वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते. नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते.

किमान १५ दिवसांनंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते /रद्द केली जाते.

  • वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे
  • विहित नमुन्यातील कोट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.
  • शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.
  • मृत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची प्रत.
  • शिधापत्रिकेची प्रत.
  • ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.
  • सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा.
  • वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात)
  • बँक, विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.
  • विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.
  • वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट, इ. बाबींसाठी महत्त्वाचे असते.

  • सौजन्य :-  लोकसत्ता