बर्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. ज्याठिकाणी पाणी देण्याची सोय आहे तेथे पिकाला संदधित पाणी द्यावे. पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर जमिनीच्या मगदुरानुसार दीड ते 2 तास ठिबक सिंचन संच चालवून पाणी द्यावे. पिकाला पाण्याचा मोठा ताण पडू देऊ नये. कायम वाफसा परिस्थिती ठेवावी. मोठा ताण पडल्यानंतर पाऊस आल्यास किंवा पाणी दिल्यास झाडे उमळण्याची (आकस्मीक मर) शक्यता असते.
पाण्याचा ताण पडलेल्या कोरडवाहू कापसासाठी…
ज्या ठिकाणी कोणतीही पाणी देण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी पिकाला हलक्या कोळपण्या करणे सुरु ठेवावे. तसेच 13.00.45 या विद्राव्य खताची (1.00%) 100 लिटर पाण्यात 1 किलो याप्रमाणात फवारणी करावी. 15 दिवसांनी परत दुसरी फवारणी करावी. रस शोषण करणार्या किडींचे सर्व्हेक्षण करून किड आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. एका वेळेस एकच किटकनाशक वापरावे. कोळपणी करणे
गुलाबी बोंडअळीसाठी फेरोमेन ट्रॅप लावून घ्यावेत व नियमीत सर्व्हेक्षण करावे. डोमकळ्या दिसल्यास तोडून नष्ट कराव्यात. किड आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास पिक संरक्षणात्मक उपाययोजना करावी. पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओल असल्यास नत्रमुक्तखतांचा हप्ता दिला गेला नसेल तर एकरी 1 गोणी युरिया खताची मात्रा द्यावी.
डॉ.संजीव पाटील
कापूस पैदासकार,
कृषी संशोधन केंद्र, जळगाव
94227 75727