विष्णू मोरे, जळगाव
Success Story… घरची परिस्थिती जेमजेम असतांना घरातील करती व्यक्ती निघून गेली तर अनेक जण खचून जातात. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील वडाळी येथील मसुपर वुमनफ कल्पनाबाई मोहिते यांनी धीर न सोडता, न डगमगता परिस्थितीशी दोन हात केले. परिस्थितीचा केवळ सामनाच केला नाही तर मकल्पनेफच्या पलीकडे जावून विजय देखील मिळविला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मुलांना उच्च शिक्षित केले असून घरच्या तीन एकर शेतीवरुन 12 एकर करण्यापर्यंत मजल मारली आहे. एवढेच नव्हे तर राजकारणात देखील दिमाखदार एंट्री केली आहे. चला तर मग जाणून घेवू या त्यांची यशोगाथा.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी या गावात कल्पनाबाई मोहिते या वास्तव्यास आहेत. याच तालुक्यातील सारंगखेडा हे त्यांचे माहेर असून त्या इयत्ता 6 वीत असतांनाच वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे वसंत चैत्राम मोहिते यांच्याशी लग्न झाले. सासरी असलेली वडीलोपर्जीत शेती व मोलमजूरी करून मोहिते कुटूंबिय आपला उदनिर्वाह करीत होते. यादरम्यान, वसंत मोहिते यांना गणपूर विसाळा येथील एका शाळेत नोकरी लागली. सर्व काही व्यवस्थीत सुरु असतांना कल्पनाबाई यांचे सासरे चैत्राम मोहिते यांचे निधन झाले. त्यातच त्यांच्या सासूबाई अपंग असल्याने वसंत मोहिते यांनी शाळेतील नोकरी सोडून गाव गाठले व शेती करुन आपला उदरनिर्वाह करु लागले.
अन् कुटूंबाचा आधार हरपला
शेती आणि मजूरीच्या माध्यमातून कुटूंबाचे रहाट गाडे जेमतेम सुरू असतांना मोहिते कुटूंबासमोर मोठे संकट उभे राहिले. वसंत मोहिते यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले. या परिस्थितीत देखील कल्पनाबाई यांनी हिम्मत न हारता अडीच लाखांचे कर्ज काढून त्यांच्यावर प्रारंभी धुळे व नंतर पुणे येथे उपचार केले. सुरुवातीला धुळे येथे 1 लाख 35 हजार रुपये खर्च करुन देखील फरक पडत नसल्याने त्यांनी पुणे गाठले. त्या ठिकाणी देखील 1 लाख 15 हजार रुपये खर्च केले. पैसे कमी पडतील म्हणून कल्पनाबाई गावी आल्या. या ठिकाणी घरातील कापूस विकून ते पैशांची तजविज करीत असतांना तिकडे त्यांच्या कुटूंबाचा आधार हरपला.
अकराव्या दिवशीच परतल्या शेतात
घरातील करती व्यक्ती निघून गेल्यामुळे 3 मुली व एक मुलगा अशा चौघांची जबाबदारी कल्पनाबाई यांच्या खांद्यावर आली. यावेळी काहींनी त्यांना माहेरी जाणार का? असे विचारले मात्र, त्यांनी साफ नकार देत प्रसंगी मजूरी करुन उदरनिर्वाह करेल, परंतु घर सोडणार नाही, अशा शब्दात नकार दिला. व पतीच्या निधनानंतर अकराव्याच दिवशी हातात रुमणं घेवून शेती कामाला सुरुवात केली. शेतात कपाशीची लागवड करुन तिच्यावर रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुलाबाळांसह स्वतः शेतात राबल्या. आऊत हकलण्यापासून ते औषध फवारणी, खुरपणी अशी सर्व कामे केली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना कापसाचे चांगले उत्पादन मिळाले आणि आलेल्या कापसाची विक्री करून त्यांनी कर्जाची परतफेड केली.
![](https://eagroworld.in/wp-content/uploads/2023/03/Shriram-Plastic-1-300x198.jpg)
मुलांना केलं उच्चशिक्षित
कर्जाचे ओझे कमी झाल्यानंतर कल्पनाबाई मोहिते यांनी कधीही मागे वळून पाहीले नाही. शेतात राबुन, एक-एक रुपया जमवून त्यांनी मोठी मुलगी सोनल हीला बारावीपर्यंत शिकवून नर्सिग करुन घेतले. दुसरी मुलगी मिनल हिचे सिव्हील डिप्लोमा, मुलगा राहुल यांचे इंजिनिअरिंग तर सर्वात लहान मुलगी शितल हीचे एम.ए. बीएड, बी.ए. डीएड पर्यंत शिक्षण केले. मुलगा राहुल यांला शिक्षणानंतर मुंबईतील एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली, मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्यानेही नोकरी सोडली व गावी परतला. आता तो देखील शेतीत रमत आहे. सोबत बीएस.सी अॅग्रीचे शिक्षण देखील घेत आहे.
3 एकर वरुन 12 एकर शेती
पतीच्या निधनानंतर आपले काय होईल, या विचारात न गुंतता कल्पनाबाई यांनी स्वत:ला शेतीमध्ये झोकून घेतले. आधीपासूनच शेती कामांची सवय असल्याने तसेच पती सोबत शेतात राबतांना शेती करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे त्यांनी शिकुन घेतलेली असल्याने त्यांनी अचुक नियोजन करुन शेती केली. शेतीच्या माध्यमातून सहा वर्षांच्या काळातच त्यांनी स्वतःची बैलगाडी, बैलजोडी, ट्रॅक्टर व आवश्यक शेती अवजारांची खरेदी केली. एवढेच नव्हे तर आपल्या मेहनतीच्या जोरावर 3 एकर शेतीवरुन 12 एकर शेती करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. स्वत:च्या मालकीची 12 एकर व 20 एकर नफ्याने अशी 32 एकर शेती त्या करीत आहेत. आधी बाजरी, मुग, कापूस यासारखी पिके त्या घेत होत्या. त्याऐवजी आता त्या केळी, पपई, ऊस यासारखी पिके घेत आहेत. शेती करतांना पाण्याची मोठी गरज भासत असल्याने कल्पनाबाई मोहिते यांनी 15 लाख रुपये खर्च करुन साडे दहा किलोमिटर अंतरावरुन शेतापर्यंत पाईपलाईन आणली आहे.
राजकारणातही प्रवेश
कल्पनाबाई मोहिते यांना लहानपणापासून समाजसेवेची आवड होती. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते. अखेर 2011 साली गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांना राजकारणात प्रवेश करावा म्हणून आग्रह केला व वडाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट बिनविरोध निवडून आणले. यातून समाजाची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम त्यांनी केले. त्यातून ग्रामस्थांचा, शेतकर्यांना प्रश्न सुटला. एवढ्यावरच त्या थांबलेल्या नाहीत. निराधार महिला, परित्यक्ता, विधवा महिलांसाठी पेन्शन मिळवणे, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडीअडचणीसाठी मदत करणे, कर्ज प्रकरणे असे अनेक प्रश्न सोडविण्याचा त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 2019 साली त्यांनी जिल्हा परिषदेची देखील निवडणूक लढली. यात त्यांचा केवळ 337 मतांनी पराभव झाला. मात्र, ग्रामपंचायतीत आज देखील त्या सदस्य आहेत.
स्वत:ला केले अपडेट
कल्पनाबाई या अल्पशिक्षित असल्या तरी त्यांनी स्वत:ला अपडेट ठेवले आहे. सुरुवातीला आऊत हाकलणार्या कल्पनाबाई आता ट्रॅक्टर चालवित आहेत. शेतातून निघणारा भाजीपाला त्या स्वत: दुचाकीवरुन बाजारात नेवून विक्री करतात. गाय, बकर्या, कोंबड्या देखील पाळलेल्या आहेत. गाय व बकर्यांना त्या स्वत: चरण्यासाठी नेतात. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यत पुरूषांइतकीच मेहनत घेवून यशाचे शिखर गाठणार्या कल्पनाबाई मोहिते यांचा जीवन प्रवास पंचक्रोशीतच नव्हे इतर जिल्ह्यातील अनेकांना थक्क करणारा ठरतोय. अनेक महिलांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत. घरातील करती व्यक्ती गेल्यानंतर महिलांची हिम्मत खचू नये म्हणून इतर महिलांना देखील त्या प्रोत्साहित करीत आहेत.
![](https://eagroworld.in/wp-content/uploads/2023/03/Ellora-Natural-Seeds-300x203.jpg)
दुख: विसरुन पुढे जायला शिकले पाहिजे
पतीच्या निधनानंतर मी जमिन विकून पैसा मिळवू शकली असते. परंतु शेती विकून मिळालेला हा पैसा पुरला नसता. त्यामुळे शेती न विकता त्यामध्ये मेहनत घेण्याचा मी निर्णय घेतला. शेतात मेहनत घेतली तर कोणीही उपाशी राहणार नाही, आत्महत्या करणार नाही. नोकरीवाला देखील सकाळी 8 वाजेला उठून नोकरीला जातो, दिवसभर मेहनत करतो आणि त्या बदल्यात महिन्याकाठी पगार घेतो. शेती देखील एक नोकरीच आहे. जीवन जगत असतांना अनेक संकटे येतात. आपल्यापुढे भरपूर दुख: आहेत. त्याला कवटाळून बसण्यापेक्षा ते दुख: बाजुला ठेवून पुढे जायचे असते.
– कल्पनाबाई मोहिते,
प्रगतीशिल शेतकरी, वडाळी, ता. शहादा, जि. नंदुरबार