- स्टोरी आउटलूक:
- कापूस पिकाला पर्याय म्हणून हळद पिकाची लागवड
- दीर्घ अनुभवानंतर आता उभारणार हळद पावडर उद्योगाचा मानस.
- चेन्ना सेलम वाणापासून विक्रमी उत्पादन घेतल्याचा दावा.
- एका गादीवाफयावर दोन ऐवजी तीन किंवा चार ओळीत लागवडीचा प्रयोग.
- फक्त विद्राव्य खते देण्याचे धोरण.
हळद उत्पादन करून प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल
कृषी विभागाने शेतकर्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहन दिल्याने अनेक शेतकर्यांनी केळी व कापसाला पर्याय म्हणून या पिकाची निवड केली. अमळनेर (जि.जळगाव) येथील अशपाक पिंजारी व मिनल शहा या दोन शेतकरी मित्रांनी भागिदारीच्या शेतीत देखील हळद लागवड करण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात दुष्काळामुळे उत्पादनाला फटका बसूनही हळद लागवड त्यांनी सोडली नाही. परिणामी आज हळदीचे विक्रमी उत्पादक म्हणून त्यांची ख्याती झाली आहे. हळद उत्पादनातील आपल्या 7 वर्षाच्या अनुभवाच्या बळावर आता ते हळद प्रक्रिया उद्योग सुरू करणार असून पुढील वर्षी आपल्या शेतातील व परिसरातील शेतकर्यांच्या हळदीची पावडर करून विकण्याचा त्यांचा मानस आहे.
अमळनेर – मारवड रस्त्यावर अमळनेरपासून 5 किलोमीटर अंतरावर धार शिवारात अशपाक पिंजारी यांची वडिलोपार्जीत 40 एकर शेती आहे. अवर्षणप्रवण धुळे तालुक्याला लागून असलेला हा भागही तसा दुष्काळीच गणला जातो. मुरुम मिश्रित हलक्या प्रतिच्या मातीत वर्ष 2010 पर्यंत कापूस, मका, ज्वारी आदी पिके घेतली जात. धार-मालपूर लघूसिंचन तलावामुळे त्यांच्या बांधापर्यंत पाणी साचू लागल्याने त्यांच्या विहिरींना दिवाळीपर्यंत बर्यापैकी पाणी राहते. फेब्रुवारी महिन्यानंतर मात्र पुन्हा पाण्याची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे ना धड बागायती पिके घेता येत ना कोरडवाहू. हळदीचा पिकाचा अनुभव मात्र वेगळा राहिला. चांगला पाऊस झाल्यावर लागवड करून जानेवारीपर्यंत सिंचनाची सोय असल्याने हळदीचे जोमदार पीक येऊ लागल्याने पिंजारी-शहा जोडगोळीने अधिकाधिक क्षेत्रात हळद लागवड सुरू केली.
‘चेन्ना सेलम’ने उत्पादनात वाढ
सध्या खान्देशात कृष्णा, सेलम, कडप्पा व राजापुरी या वाणांची लागवड होते. सेलम वगळता इतर वाणांचे एकरी उत्पादन कमी येते, असे अशपाक यांचे म्हणणे आहे. चेन्ना सेलम वाणाबाबत ते म्हणाले की, सेलमपेक्षाही गुणवत्तेत व उत्पादनात सरस असलेल्या चेन्ना सेलम या वाणाची लागवडीसाठी निवड केली. हे वाण सेलम पासून निवड पद्धतीने तयार झाले आहे. ह्या वाणापासून उत्पादित हळदीत कुरकुमीन चे प्रमाण अधिक आहे. आतील गर जादा असल्याने सुक्या हळदीचा एकरी उताराही सर्वाधिक आहे. सेलमचा उतारा 100 किलो ओल्या हळदीपासून 20 किलो, कृष्णा व कडप्पाचे 15 ते 16 किलो, तर चेन्ना सेलमचा उतारा 20 ते 25 किलो इतका मिळतो. खान्देशात सुरवातीच्या काळात सेलमची लागवड होत होती, मात्र आता त्या वाणात भेसळ झाली असल्याने या दोघांनी चेन्ना सेलमची निवड केली.
लागवडीचे नवे तंत्र
गादीवाफ्यावर दोन ओळीत लागवडीची सुधारित पद्धती आहे. या दोन ओळींच्यामध्ये ठिबक सिंचनाची नळी टाकण्यात येते. एक फुटावरच्या ड्रीपरमुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. या दोघांनी मात्र एका गादीवाफ्यावर 3 तसेच 4 ओळीत हळद लागवड केली. गादीवाफे तयार करताना ते अर्धेच केले. नंतर टप्प्या टप्प्याने भर दिल्याने हळदीचे चांगले पोषण होऊ शकले. तीन किंवा चार ओळीतल्या लागवडीसाठी नेहमीपेक्षा जास्त बेणे लागते. मात्र उत्पादनात वाढ होत असल्याने फायदा होतो, असा त्यांचा अनुभव आहे. 16 एमएम लॅटरल व 1 फुटावरील ड्रीपरद्वारे पुरेशे सिंचन होते.
फक्त विद्राव्य खतांचा वापर
गादीवाफे तयार करण्यापूर्वीच शेणखत पसरविले जाते. सध्याचा जमिनीचा पोत पाहता सुपर फॉस्फेट व पोटॅश ही दाणेदार स्वरूपातील खते जमिनीतून दिली तरी पिकांना फारसा उपयोग होत नाही, हा अनुभव आल्याने आता हळदीसाठी सुरवातीपासूनच विद्राव्य खते दिली जातात. सुरवातीच्या 3 महिन्यांपर्यंत 19ः19ः19 व पुढच्या 3 महिन्यात 12ः61ः00 हळद पक्व होण्याच्या काळात 0ः0ः50 असा विद्राव्य खतांचा डोस दिला जातो. पिकाच्या याच कालखंडात ते सल्फेट देतात त्यामुळे हळदीतील कुरकुमीनच्या प्रमाणात वाढ होते. हळदीची वाढ चांगली झाल्यास कंदही चांगले पोसले जातात. परंतू, युरियाचा अनावश्यक डोस दिल्यास कायिक वाढ होणे नुकसानीचे ठरू शकते. युरीया दिल्याने फक्त वरची पाने आणि दांड्याची वाढ होईल कंदांची वाढ होणार नाही. त्यामुळे युरियाचा अधिक वापर टाळून पोषक अन्नद्रव्य देण्याकडे आमचा कल असतो, असे पिंजारी यांनी सांगितले.
सिंचन व्यवस्थापन
सिंचनासाठी 3 विहिरी व 1 बोअरवेलचा वापर केला जातो. या भागात मे-जून महिन्यात पाण्याची पातळी फारच खोल जात असल्याने भरपूर पाऊस झाल्यानंतरच हळदीची लागवड केली जाते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावरच गरज भागते. मात्र पावसाने ओढ दिल्यास ठिबक संचाद्वारे पाणी दिले जाते. धार-मालपूर सिंचन तलावामुळे या शिवारातील विहिरींना 7 ते 8 महिन्यापर्यंत चांगले पाणी असते. हळदीला एवढ्याच कालखंडात पाण्याची गरज असते. हळदीत कायम वाफसा परिस्थिती ठेवल्यास जमीन नरम राहते. त्यामुळे हळदीचा कंद पोसला जाऊन उत्पादन वाढते.
किडरोग नियंत्रण
हळद हे औषधी पीक आहे. हवामानातील बदल किंवा देखभालीत दुर्लक्ष झाल्यास भाद्रपद महिन्यात करपा येऊ शकतो. तसेच पाने कुरतडणार्या अळीचाही प्रादुर्भाव होतो. पाने खाणार्या अळीचा प्रादुर्भाव हळदीवर होतो. परंतू त्याचे प्रमाण अत्यल्प असते. नुकसानीची पातळी अल्प असेल तर फवारणी टाळली जाते मात्र नुकसानीची शक्यता अधिक असेल तेव्हा क्विनॉलफॉसची पंपाद्वारे फवारणी केली जाते. मात्र वर्षानुवर्षाच्या लागवडीनंतरही पाने खाणार्या अळींसाठी यांना कोणत्याही प्रकारची फवारणी करावी लागलेली नाही. भाद्रपद महिन्यात अचानक तापमानात वाढ होते. हवेत आर्द्रता व वाढत्या तापमानामुळे केळीप्रमाणे हळदीवर करपा येऊ शकतो. अशावेळी रोगाच्या आगमनापूर्वीच कॉन्टाफ प्लस (हेक्झाकोनॉझोल) व टिल्ट (पेन्टॅकोनॉझोल) या बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. हळदीच्या शेतात पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेतल्यास हळकुंडे निरोगी राहतात व मुळ्या कुजत नाहीत. त्यामुळे हळदीचे गड्डे चांगले पोषले जातात.
पिकाची काढणी
हळद हे कंदवर्गीय पीक असल्याने ते पक्व झाले आहे की, नाही हे पिकाच्या बाहेरील परिस्थितीवरुन दिसते. याबाबत अशपाक यांनी सांगितले की, नैसर्गिक परिस्थिती पोषक राहिली, खत व सिंचनाचे चांगले व्यवस्थापन राखले गेल्यास पीक 8 ते 9 महिन्याचे झाल्यानंतर काढणीस तयार होते. पीक 240 दिवसाचे होईपर्यंत पाणी दिले जाते. काढणीच्या 1 महिन्याअगोदर पाणी देणे बंद करण्यात येते. पीक पक्व होऊनही पाणी देणे सुरू ठेवल्यास जमीन टणक होऊन काढणीस त्रास होतो. साधारण मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पीक काढणीला सुरवात होते. पीक पक्व झाल्याची ओळख हळदीच्या दांड्यातला अर्क कंदात उतरून दांडा पूर्ण वाळतो. सुकलेली पाने शेताबाहेर काढली जातात. त्यानंतरच पीक काढणीस सुरवात होते. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी करून (आडवी पास मारुन) हळदीचे कंद उकरले जातात. त्यानंतर महिला मजुरांकडून वेचणी केली जाते. वेचणी करतानाचे मातृकंद वेगळे केले जातात. निवड करून हळद हवा खेळती राहू शकेल अशा जाळीदार पिशव्यांमध्ये भरुन ठेवली जाते.
विक्री व्यवस्थापन
सुरवातीची दोन वर्षे त्यांनी ओल्या हळदीची प्रक्रिया करुन विक्री केली. वाफेच्या सहाय्याने हळद शिजवण्याचे युनिट पिंजारी यांच्याकडे आहे. यावर्षी मात्र त्यांनी नंदुरबार येथील हळद उद्योजक आणि व्यापारी अठावाल यांना ओल्या हळदीची विक्री केली आहे. सरासरी 1 हजार रुपये क्विंटल या दराने त्यांनी 500 क्विंटल हळद विकली आहे. त्याच्या हळदीची गुणवत्ता दर्जेदार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून बेण्यासाठी मागणी होत आहे. ज्यांना बेणे हवे असेल त्यांना एकावेळी 5 क्विंटलपर्यंतचे बेणे ते कुरीयरने पाठवतात.
वीस एकरात लागवड
सध्याच्या हंगामात त्यांनी 5 एकर लागवड केली होती. त्यातील बेण्यातून ते यंदा 20 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रात लागवड करणार आहेत. वर्ष 2010-11 पासून त्यांना हळद उत्पादनाचा अनुभव असल्याने त्यांनी यंदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव क्षेत्रातील हळदीला सिंचनाची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी त्यांच्या दोन विहिरींचे खोलीकरण केले आहे.
हळद प्रक्रिया उद्योगाचा संकल्प
अशपाक पिंजारी व मिनल शहा यांची परिसरात हळदीचे शेतकरी म्हणून ओळख तयार झाली आहे. त्यांनी आता फक्त उत्पादक न होता प्रक्रिया उद्योजक बनण्याचाही निर्णय घेतला आहे. आपल्याच शेतात तयार झालेल्या हळदीची पावडर करून ते आता विकणार आहे. त्यासाठी मशिन खरेदी अंतिम टप्प्यात आहे. उद्योगाला पुरेशी हळद उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी स्वतः तर लागवडीखालील क्षेत्र वाढवले आहे. याशिवाय परिसरातील शेतकर्यांना हळदीचे बेणे देऊन त्यांनी उत्पादित केलेली हळद विकत घेण्याचे करार करण्याची तयारी केली आहे. या मित्रांच्या प्रक्रिया उद्योग उभारणीच्या प्रयत्नांमुळे परिसरात नवा रोजगार निर्माण होणार असून शेतमालाचे मुल्यवर्धन होऊन शेतकर्यांचे उत्पन्न वाढणार आहे.
शाळेपासून व्यवसायातही सोबत
अशपाक पिंजारी व मिनल शहा यांची दोस्ती शाळेपासूनची. तिला आता 23 वर्षे होत आहेत. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परषदेच्या माध्यमातून दोघांची दोस्ती अधिक घट्ट झाली. शिक्षण संपल्यावर या दोघांनी शेती आणि हॉटेल व्यवसाय भागिदारीतच करायला प्रारंभ केला. हे दोघे जसे शेतीत भागिदार आहेत तसे नागपूर-धुळे महामार्गावर मोंढाळे गावाजवळ ’गुुजरात हॉटेल’ नावाचे हॉटेलही चालवतात. शेतीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात असूही ह्या दोघांची मैत्री परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
हळद पिकाचे खर्च व उत्पन्न
(सर्व आकडे प्रति एकरी)
लागवड पूर्व मशागत व गादीवाफे तयार करणे ः 3 हजार रु.
बेण ः 30 हजार रु.
विद्राव्य खते ः 5 हजार रु.
लागवड मजुरी ः 5 हजार रु.
निंदणी ः 3 हजार रु.
हळदीला भर लावणे ः 1 हजार रु.
फवारणी ः 2 हजार 500 रु.
काढणी ः 8 हजार रु.
इतर खर्च ः 5 हजार रु.
एकूण एकरी खर्च ः 62 हजार 500 रु.
यावर्षी हळद शिजवण्याची प्रकिया न करता काढलेल्या ओल्या हळकुंडांचीच सरळ विक्री केली आहे. सरासरी 150 क्विंटल उत्पादन आल्याने प्रति क्विंटल 1 हजार रुपये या दराप्रमाणे 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न आले. खर्च वजा जाता एकरी 87 हजार 500 रुपये इतके उत्पन्न आले.
प्रतिक्रिया:
लागवड व काढणी वगळता हळदीसाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. तामिळनाडूत हळदीचे प्रामुख्याने उत्पादन घेतात. परंतू, महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात खान्देशातील वातावरणात हळदीचे विक्रमी उत्पादन येऊ शकते हे सिद्ध झाले आहे. वादळ, गारपीट यासारयख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचाव होणारे हे पीक आहे. तसेच गुराढोर खात नसल्याने त्यांच्या पासूनही संरक्षण होते. हळद उत्पादित करावी, शिजवावी व वाळवून त्याची सांगलीच्या बाजारात नेऊन विकावी. या गोेष्टीला फाटा देऊन आता हळदीचा पावडर तयार करून विक्रीचा प्रकल्प सुरू करण्याचा आम्हा दोघा मित्रांचा संकल्प आहे. अशपाक पिंजारी
मिनल शहा
रा. अमळनेर, जि. जळगाव
मो.नं. 9503210270