फैजपूरच्या दत्तड्रीप इरिगेशनचे संचालक जितेंद्र पवार यांची प्रेरणादायी यशोगाथा
आपले ध्येय निश्चित असेल तर यशाचा डोंगर सर करणे फारसे कठीण जात नाही, हे वाक्य फैजपूर येथील दत्तड्रीप इरिगेशन कंपनीचे संचालक जितेंद्र प्रकाश पवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. लहानपणापासूनच त्यांना उद्योग विश्वाचे विशेष आकर्षण होते. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करायचे त्यांचे स्वप्न होते. प्रॉडक्शन विषयात अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यावर नामांकित महाविद्यालयात प्राध्यापकाच्या नोकरीची संधी चालून आली. दोन वर्ष प्राध्यापक म्हणून कामही केले. परंतु, उद्योग विश्व खुणावत असल्याने त्यांनी प्रतिष्ठेची मानली जाणारी प्राध्यापकाची नोकरी सोडून उद्योजक म्हणून स्वत:चे नशीब आजमविले. मेहनत आणि जिद्दीच्या बळावर ते यशस्वीही झाले. सूक्ष्म सिंचनासाठी लागणार्या साहित्याची निर्मिती करणारी त्यांची कंपनी असून तिचे कार्यक्षेत्र सातासमुद्रापार आहे. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा आजवरचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
रावेर तालुक्यातील चिनावल हे जितेंद्र पवार यांचे मामांचे गाव. याच गावात त्यांचा जन्म झाला. सांगली जिल्ह्यातील तासगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. परंतु, त्यांच्या आईला भाऊ नसल्याने त्यांचे कुटुंब चिनावलला स्थायिक झाले होते. तेथे आई-वडील, आजी आणि लहान भाऊ यांच्यासोबत ते राहत होते. वडील प्रकाश जयसिंगराव पवार हे वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी फॅक्टरीत नोकरीला तर आई चिनावल येथील कन्या शाळेत शिक्षिका असल्याने त्यांचे संपूर्ण बालपण चिनावल येथेच गेले. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी चिनावल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात घेतले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, प्रवेश घेताना त्यांनी अर्जात इतर कोणत्याही दुसर्या शाखेचा पर्याय भरला नव्हता. शिवाय महाविद्यालयदेखील एकच निवडले होते. चांगले गुण असल्याने त्यांना जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. अभियांत्रिकी पदवीधर झाल्यानंतर प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र, त्यात मन रमत नसल्याने त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यावर मित्रासोबत व्यवसाय सुरू केला. वर्षभर हा प्रयोग करून पाहिल्यानंतर चार मित्रांसोबत एक कंपनी उभारली. पाच वर्षानंतर ते कंपनीतून बाहेर पडले. उद्योग विश्वात पाऊल टाकल्यानंतर पहिल्या सहा वर्षात आलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची कंपनी उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. अथक परिश्रम, सातत्य आणि उद्योग जगतातील नव्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी भरारी घेतली.
डिप्लोमाला दोन वेळा अनुत्तीर्ण…
दहावीनंतर जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाला प्रवेश घेतल्यावर ते सुरुवातीला दोन वेळा अनुत्तीर्ण झाले होते. मात्र, चूक उमगल्यानंतर त्यांनी चांगला अभ्यास केला. तिसर्या प्रयत्नात ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्रॉडक्शन इंजिनिअरींग (बी.ई.) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. याच काळात ते इंजिनिअर असलेल्या एका मित्राच्या संपर्कात आले. तो मित्र नामांकित कंपनीत नोकरीला होता. कामानिमित्त त्याच्यासोबत ते विविध नामांकित आणि मोठ्या कंपन्यांना भेटी देत असत. त्यामुळे दुसर्याच्या मालकीच्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा गावाकडे आपली स्वत:ची मोठी कंपनी असावी, असा विचार त्यांच्या मनात आला. पुढे हाच विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला.
प्राध्यापकाच्या नोकरीला सोडचिठ्ठी
1992 मध्ये अभियांत्रिकीचा निकाल लागल्यानंतर चौथ्या दिवशीच त्यांना चिनावल येथील स्व. दिगंबरशेठ नारखेडे यांच्या प्रयत्नांमुळे जे.टी. महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. दोन वर्ष त्यांनी ही नोकरी केली. मात्र, त्यानंतर नोकरी सोडून 1994 मध्ये एका मित्रासोबत सूक्ष्म सिंचनाच्या घटक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नाशिकच्या प्रगती इरिगेशन कंपनीची डिलरशीप त्यांनी घेतली होती. वर्षभर हा व्यवसाय केल्यावर त्यांनी 1995 मध्ये दुसर्या चार मित्रांसोबत महालक्ष्मी इरिगेशन नावाची कंपनी सुरू केली. पाच वर्ष सोबत काम केल्यानंतर 2000 मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले. 2001 मध्ये त्यांनी दत्त इरिगेशन ही स्वत:ची कंपनी उभारली.
विकास सोसायट्यांचे पाठबळ
दत्त इरिगेशनची स्थापना केल्यानंतर त्यांना सुरुवातीला खूप आर्थिक अडचणी आल्या. सुदैवाने अनेक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून कर्ज उपलब्ध झाल्याने आर्थिक प्रश्न सुटला. या कामी फैजपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने सर्वाधिक मदत केली. त्या काळी उद्योग-व्यवसायात फारसी स्पर्धा नव्हती. सूक्ष्म सिंचनाचे नवे तंत्रज्ञान आले होते. त्याला मोठी मागणी असल्याने उद्योगात त्यांचा चांगला जम बसला. 2007 मध्ये त्यांनी सर्व पतसंस्थांचे कर्ज चुकते केले. उद्योग सांभाळताना आर्थिक तारांबळ होत असताना त्यांनी कधीही बँकांच्या कर्जाचे हफ्ते, मालाची बिले तसेच कर्मचार्यांचे पगार थकू दिले नाहीत. काही अडचणींमुळे गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच फेब्रुवारी 2018 मध्ये कर्मचार्यांचा पगार 10 तारखेऐवजी 24 तारखेला झाला. मात्र, त्याबद्दल कर्मचार्यांनीही तक्रार केली नाही. मी चारित्र्याला जपणारा माणूस आहे. उसाच्या फडातून जाईल; परंतु, अंगाला उसाचे पान लागू देणार नाही, असा माझा मूळ स्वभाव आहे. येणार्या प्रत्येक अडचणीला मी कामाचा भाग मानले. त्यानुसार काम करत गेल्यानेच मला यश मिळाले, असे पवार यांनी सांगितले.
ब्रँड डेव्हलपिंग
दत्त इरिगेशन म्हणून स्वत:चा ब्रँड डेव्हलप करण्यासाठी 2001 पासून सातत्याने तपश्चर्या सुरू आहे. कंपनीचे उत्पादन उत्कृष्ट असावे म्हणून 100 टक्के शुद्ध कच्चा माल वापरला जातो. उत्पादनात कधीही तडजोड केली नाही. ज्या ठिकाणी उत्पादनाला कमी प्रतिसाद मिळाला; त्याठिकाणी तडजोड करून व्यवहार केले. म्हणूनच कंपनी उभारल्यानंतर पहिल्या वर्षी सुमारे 16 लाख रुपये असणारी उलाढाल आज सुमारे 8 ते 10 कोटी रुपये इतकी आहे. कंपनीचे कार्यक्षेत्र राज्यापुरते मर्यादित नसून त्याच्या कक्षा परदेशांपर्यंत विस्तारल्या आहेत. उद्योग क्षेत्रात येणारे नवनवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नव्या बदलांना सामोरे जाता आले तर यश निश्चित मिळवता येते, असा सल्लाही त्यांनी दिला.
सुशिक्षित कुटुंब
जितेंद्र पवार यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. ते स्वत: प्रॉडक्शन इंजिनिअर आहेत. तर त्यांच्या पत्नी कविता यांचे बी.ई. इलेक्ट्रिकल व मुलगा युगंधर पवार यांचे बी.ई. मेकॅनिकलचे शिक्षण झाले आहे. युगंधर हे आता वडिलांना कामात मदत करतात. कविता या उत्तम समुपदेशक व निसर्गोपचार तज्ज्ञदेखील आहेत. पवार यांना वाचनासोबतच मित्र बनविण्याचा छंद आहे. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांचा आध्यात्मिकचा गाढा अभ्यास आहे.
आयुष्यातील टर्निंग पाईंट!
डिप्लोमाला असताना त्यांना वाईट संगत जडली होती. त्यामुळेच ते सुरुवातीचे दोन वर्ष अनुत्तीर्ण झाले. मात्र, तरीही त्यांना या गोष्टीचा खेद नव्हता. मित्राच्या खोलीवर गप्पा-गोष्टी करण्यासाठी ते नेहमी जात असत. त्यावेळी त्यांच्या मित्राच्या खोलीजवळ अकोल्याचा संजय देशमुख नामक विद्यार्थी राहत होता. तो एमबीए करत होता. त्याने एकदा पवार यांना तुम्ही सगळं करताय मग अभ्यासच का करत नाही? असा प्रश्न केला. याच प्रश्नाने पवार यांना भानावर आणले. आपले कोठेतरी चुकतेय, याची जाणीव झाल्याने त्यांनी वाईट संगत सोडून अभ्यासाचा मार्ग धरला. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. देशमुख याचा प्रश्न त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने कलाटणी देणारा ठरला.