बावी (ता. आष्टी)
येथील वैभव बाबासाहेब गोल्हार या तरुण उच्चशिक्षित शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीवर मात करत गेल्या पाच वर्षापासून कांदा उत्पादनात लागवड पद्धतीत बदल आणि ठिंबकच्या वापरातून उत्पादनात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळी भागातही कमी पाण्यावर यशस्वी शेती करता आली. हवामान बदलानुसार खत, पाणी व्यवस्थापन केले जात असल्याने त्यांचा आता कांदा उत्पादनात हातखंडाच झाला आहे. तुर, सोयीबीन यांच्याही उत्पादनात प्रयोगातून वाढ केली आहे. शेतीच्या मदतीनेच कुटूंबात आर्थिक समृद्धी आणत भावंडाना उच्चशिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नगर जिल्ह्याला जोडून असलेल्या आष्टी (जि. बीड) तालुक्यात सिंचनाचा कायम अभाव आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी सातत्याने दुष्काळासारख्या अपत्तीला तोड देतात. गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईचे परिणाम शेतीवर दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी शेतीत प्रयोग करुन उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
उच्चशिक्षित परिवार
– बावी (ता. आष्टी) येथील वैभव आबासाहेब गोल्हार हे बीए. बीएड शिक्षण झालेले तरुण शेतकरी. वडील पंधरा वर्षापासून शेतीसोबत गावांत दुध संकलनाचा व्यवसाय करतात. वैभवचे भाऊ वैष्णव ‘एमबीबीएस’ ला फिनाफईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत असून दुसरे भाऊ नामदेव आळंदीत अध्यात्मिक शिक्षण घेत आहे तर बहिण नगरमध्ये उच्च प्राथमिक शिक्षण घेत आहे. गोल्हार कुटूबाला वडिलोपार्जित पंधरा एकर शेती आहे. वैभव यांच्यावर शिक्षणानंतर घरची जबाबदारी पडल्याने त्यांनी नोकरी न शोधता शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कांदा पिकांच्या लागवड व व्यवस्थापन प्रयोगातून उत्पादनात वाढ केली आहे. शेतीच्या जोरावरच त्यांनी भाऊ, बहिणीनीं उच्च शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतीत विक्रमी उत्पादन
वैभव यांनी खत, पाणी आणि फवारणी व्यवस्थापनातून तीन वर्षापुर्वी कापसाचे एकरी २० क्विंटल, गेल्यावर्षी तुरीचे एकरी १८ क्विंटल उत्पादन घेतले आहे. सोयाबीचे यावर्षी एकरी १४ क्विंटल उत्पादन घेतले. वैभव कांदा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. त्यांनी राज्य, देशातील कांदा उत्पादनाचा अंदाज बांधून कांदा दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. याच माध्यमातून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱयांशी ते संवाद साधतात.

ठिंबकचा वापर ठरला फायदेशीर
वैभव यांनी गेल्या पाच वर्षापासून सतत्याने कांदा उत्पादनात सातत्य ठेवले आहे आणि कांदा लागवडीला विना खुपरणीचा लागवड प्रयोग राबवला. बावी परिसरात साधारण हलक्या प्रतीची जमीन, डोंगराळ, दुष्काळी भाग असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष. यामुळे ज्वारी, बाजरी, हुलगे, उडीद यासारखी पीके घेत. मात्र फारसं उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याने वैभव यांनी पाच वर्षापुर्वी कांदा लागवडीचा निर्णय घेतला. त्यावेळी कांद्याला दर मिळत नसल्याने कुटूंबांने कांदा पीक घेण्याला विरोध केला. मात्र विरोध डावलून एक एकर कांदा लागवड केली. सर्वसाधारण सरी अथवा वाफे पाडून कांदा उत्पादन घेतले जाते. वैभव यांनी मात्र वाफे, सरी न पाडता थेट जमीनीला पाळी घालून त्यावर साधारण आॅगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड केली. त्यात कांद्ासाठी ठि्बकचा वापर केल्यामुळे कमी पाण्यात यशस्वी उत्पादन घेता आले. लागवडीनंतर चार दिवसांनी तणनाशकाची फवारणी केली. त्यामुळे कांद्याची खुरपण करण्याची गरज भासत नाही आणि साठ दिवस गवत येत नाही. बेड, सरी न करता थेट जमीनीवर लागवड केल्याने शेतातून पाण्याचा निचरा व्हायला व जमीनीत पोकळी राहण्याला तसेच कांदा पोसण्याला सोपे गेले. याशिवाय कांद्याला ठिंबकचा सुरवातीपासूनच वापर केला.
सर्वसाधारण भुसार पिकांचे उत्पादन घेण्याऱ्या या भागात विना खुरपणीच्या कांदा लागवड केलेला कांदा पहायला लोक परिसरातून येऊ लागले. त्यानंतर लागवडीत सातत्य ठेवत लागवड क्षेत्रातही वाढ केली. यंदा पाच एकरावर लागवड केली. पहिल्या वर्षी एकरी सहा टन उत्पादन मिळाले आणि प्रती किलोला साधारण वीस रुपयाचा दर मिळाला. दुसऱया वर्षी एकरी सात टन उत्पादन निघाले आणि पस्तीस रुपये प्रती किलो दर मिळाला. तिसऱ्या वर्षी एकरी ९ टन उत्पादन निघाले आणि पंधरा ते वीस रुपये दर मिळाला. यंदा एकरी तब्बल तेरा टनाचे उत्पादन निघाले आणि ५० रुपयापासून १५० रुपयापर्यत प्रती किलो कांद्याला दर मिळाला.
व्यवस्थापनाला दिले प्राधान्य
या भागात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करणारे शेतकरी अगदी अल्प. वैभव यांनी मात्र शेती करताना लागवड व आणि खत, पाणी व्यवस्थापना प्राधान्य देत त्याचे नियोजन केले. कांदा लागवडीची पद्धत स्वतःच बदलली. कांदा लागवडीआधी सुक्ष्मअन्न द्रव्य, लागवडीच्या २१ दिवसाने नत्राचा वापर, चाळीस ते पन्नास दिवसाने पोटॅशचा डोस देण्याचा आणि लागवडीच्या पन्नास दिवसानंतर खत न देण्याचा प्रयोग केला. लागवडीच्या वीस ते तीस दिवसानंतर हवामानानुसार बुरशीनाशकाची फवारणी केली. त्यातही नुकसान टाळण्यासाठी पहिली फवारणी कमी क्षमतेची केली. रोगाचा प्रादुर्भाव नसला तरी काही शेतकरी रोग पडू नये म्हणून फवारणी करतात, मात्र रोग नसेल तर फवारणी करुच नये असा सल्ला वैभव देतात. पाण्यासाठी एक विहीर असून त्यात उपलब्ध पाण्याचा वापर करतात. विशेष म्हणजे विहीरीत पुर्ण खडक असून विहीर पावसाळ्यात भरुन ठेवली जाते. बदलते वातावरण यामुळे खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांचे कांदा पीक रोग, बदलते हवामान यामुळे वाया गेले, मात्र वैभव यांनी लागवड पद्धतीत बदल, पाणी, खत व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे कांदा पीक यशस्वी घेता आले. पावसाळ्यात ते लाल नाशिक कांद्याची लागवड करतात. पाणी व्यवस्थापनात साधारण ८ ते १२ दिवसाला ठिंबकने पाणी देतात. गरज नसतानाही पाणी दिले तर पात वाढते आणि कांद्यावर रोग पडतो. त्यामुळे कांदा सुकल्याशिवाय पाणी देत नाहीत.

बिजोत्पादन, रोपे स्वतः करतात
दुष्काळी भागामध्ये कांदा उत्पादनात नावलौकीक मिळवलेले वैभव कांदा बिजोत्पादन आणि रोपे स्वतः तयार करतात. चार वर्षापासून दरवर्षी १० गुंठे क्षेत्रावर कांदा बिजोत्पादन घेतात. त्यातून मिळणारे ३० किलो बियाणेपैकी स्वतःसाठी पंधरा किलो वापरतात तर १५ किलोची एक हजार रुपये किलो दराने विक्री करतात. कांदा लागवडीसाठी रोपेही तयार करताना बियाणे टाकताना ते पातळ पडेल अशी व्यवस्था करतात. पातळ बियाणे टाकल्यावर रोपांची उगवण चांगली होत असल्याचा अनुभव आला. पहिल्या वर्षी दाट बियाणे टाकल्याने साधारण पंधरा टक्के बियाणे वाया गेले. त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून बियाणे टाकण्यातही बदल केला.
दोनशे शेतकऱ्यांनी केली लागवड
वैभव यांनी विना खुरपण लागवड तंत्रानुसार स्वतः कांदा लावगड केली आणि उत्पादनात वाढ केल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी लागवड केलेला कांदा पाण्यासाठी एक अनेक शेतकऱ्यांनी शेतावर भेटी दिल्या आहे. (दिवसात) परिसरातील दोनशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी वैभव यांनी सुचवलल्या विना खुपरपणी तंत्रानुसार लागवड केली आहे. वैभवही शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात. याशिवाय लागवड काढणीसह अन्य कामांसाठी २० मजुरांना काही काळ रोजगारही मिळतो.
दुष्काळाचा सातत्याने फटका
आष्टी तालुक्यातील शेतकरी कायमच दुष्काळाशी सामना करत आहेत. वैभव यांच्या शेतीलाही दुष्काळाचा मोठा फटका बसला. गेल्यावर्षी त्यांनी ५ एकर कांद्याची लागवड केली होती. मात्र पाणी मिळू शकले नसल्याने तीन एकरावरील कांद्याचे पीक जळून गेल्याने आर्थिक नुकसान झाले. याशिवाय उडीद, मुग यासह इतर पिकेही जळून गेल्याने फटका बसला.
स्वातीताईंची भक्कम साथ
वैभव गोल्हार यांचे ७ लोकांचे कुटूंब. वडील आबासाहेब, आई मंगल, पत्नी शेतात राबतात. पत्नी स्वाती यांची वैभव यांना भक्कम साथ असते. वैभव शेतीच्या कामासाठी टॅंकरसह अन्य औजाराचा वापर करतात. गरजेच्या वेळी साथ देण्यासाठी स्वाती टॅक्टर चालवत सगळी शेतीची कामे करतात. दोन वर्षापासून स्वाती टॅक्टर चालवत असल्याचे परिसरातील लोकांनाही कुतूहुल वाटते. शेतीतील बहूतांश व्यवस्था स्वातीच पाहतात.
संपर्क ः वैभव गोल्हार मो. ९४२०४१२९००
