सोनिजवळा येथील ससाणे यांचा प्रयोग
पूर्व हंगामी केशर आंबाचे उत्पादन घेण्यात सोनिजवळा (ता.केज, जि.बीड) येथील ससाणे कुटुंबाला शक्य झाले आहे. यामुळे इतर आंबा बाजारात येणार्या अगोदर त्यांच्याकडील आंबा विक्री होणार आहे. चार एकरात त्यांनी आंबा लागवड केली असून त्यामध्ये लिंबाचे आंतरपीक देखील घेतले आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा तसा कमी पावसाचा. सरासरी 500 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो. पण आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर. नेकनूरच्या हूर या वाणाने तर देशाच्या सिमा ओलांडल्या आहेत. केज तालुक्यात सोनिजवळा हे बाराशे लोकवस्तीचे गाव आहे. याच गावात ससाणे याचे चार भावंडाचेकुटुंबे. त्यातील एक भाऊ मुंबई येथे कंपनीत नोकरी करतो इतर तिघे शेती करतात. घरी 9 एकर जमीन, एक विहीर आहे. ते नेहमी पारंपरिक सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, हरबरा, मका अशी पिके घेत. यातून कुटुंबाचा खर्च जेमतेम भागत असे. वेळप्रसंगी इतराकडे रोजंदारीने जावे लागायचे. मुंबई मध्ये नोकरीस असणार्या रतन यास शेती नगदी पिकाची असावी असे वाटत होते. यामुळे त्यांनी चार वर्षापूर्वी केशर आंब्याची बाग लावली.
केशर आंबा लागवड
केशर आंबा लागवडीसाठी टेंभूर्णी (जि.सोलापूर) येथून एका रोपवाटिकेतून कलमे आणली. चार एकर क्षेत्रात 20 बाय 10 फूट अंतरावर शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. त्यासाठी 2 फुटाचे लांब, रुंद आणि खोल खड्डे घेतले. ते गांडूळ खत, काडी कचरा व थिमेट टाकून मातीने भरले. ऑगस्ट महिन्यात त्या ठिकाणी जवळपास 1 हजार कलमे लावली. त्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली. विहिरीचे पाणी कमी पडू लागले म्हणून दोन बोअरवेल घेतले. तीन वर्षानंतर विजटंचाई वर उपाय म्हणून जैन सोलर पंप बसवला.
बाग लावल्यापासून मध्ये अंतरपिके घेतली, त्यामधे सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके घेतली. सध्या भुईमूगाचे उत्पादन होणार आहे.
खताचे व्यवस्थापन
दरवर्षी जून महिन्यात झाडांच्या वाढीनुसार 1 किलोपासून सुरू करून या वर्षी मे महिनाखेर प्रती झाड 3 किलो 19ः19ः19 त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य 500 ग्रॅम, कॅल्शियम, बोरान यांची मात्रा 5/5 दिवसाच्या अंतराने ठिबकमधून दिली. त्याचबरोबर देशी गाईच्या गोमुत्र व शेणाची स्लरी करून गाळून ठिबकने दिली. नवी पालवी फुटल्यानंतर दरमहा खताचे डोस बंद करून विनय वाघदरे यांच्या सल्ल्यानुसार खत दिले. तिसर्या वर्षी प्रायोगिक स्वरूपात फळ उत्पादन घेतले. त्यातुनच यावर्षीचे नियोजन करता आले.
रासायनिक, सेंद्रिय पद्धत
सरासरी दरवर्षी आंबा एप्रिल महिन्यात विक्रीस येतो. पुरवठा जास्त झाला की, भाव मिळत नाही. त्यामुळे ससाणे कुटुंबीयांनी जून महिन्यापासून नियोजन केले. झाडाला आकार देऊन ते 7 फुटापेक्षा जास्त वाढू नये म्हणुन छाटणी (प्रोनिंग) केली. त्यामुळे झाडे डेरेदार झाली. याचवेळी गांडूळ खत प्रती झाड 2 किलो बरोबर पोटॅश, मॅग्नेशियम, 24ः24, व 20ः20ः0 ही रासयनिक खतांची योग्य प्रमाणात मात्रा दिली. ऑगस्ट मध्ये फळ फांदी बाहेर पडली. त्यावेळेपासून किडरोग नियंत्रण करण्याची खबरदारी घेतली. तोपर्यंत पाणी सुरू होते. नवी पालवी फुटताच पाण्याचा ताण दिला. त्यामुळे चांगली फळकाडी तयार झाली. मात्र त्यासाठी ग्रोथ हार्मोन्स दिले. ऑक्टोबर मध्ये मोहोर लागला. किटक नाशकाचा वापर आणि देशी गायीचे गोमुत्र व गुळ यांची फवारणी सुरू केली. कीड रोगामध्ये तुडतुडे, अळी, भुरी, व फळकुज यांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी इमिडा, थिमेट, कोरायझीन, नुवान, मार्शल, कॅनतौप, रोको, ताकद यासारख्या औषधांची फवारणी केली. त्यामुळे मधमाशी वाढून मोहोर गळण्याचे प्रमाण कमी झाले. चांगली फळधारणा झाली. प्रती आठवडा 6 तास ठिबकद्वारे पाणी दिले.
हंगामपूर्व आंबा मोहरला
बाजारात इतरांचा केशर आंबा येण्यापूर्वी आपले फळ विक्रीला आले, तर चांगला भाव मिळेल या हेतून ससाणे यांनी नियोजन केले. मार्च महिना अखेरीस फळाचा पहिला तोडा बाजारात येईल. पहिल्या तोड्यात सुमारे 15 टन उत्पादन अपेक्षित आहे. दुसर्या तोड्यात 10 टन, तर शेवटी 5 टन फळ मिळणे अपेक्षित आहे. पहिला तोडा महत्वाचा असून एका फळाचे वजन 230 ते 260 ग्रॅम आहे. त्यामुळे हे फळ निर्यातक्षम आहे. त्यामुळे एका व्यापार्याने 140 रुपये प्रती किलो दर देऊ केला. पण त्यांनी फळ दिले नाही. त्यांना अजुन वाढता भाव मिळेल, अशी आशा आहे. आतापर्यंत या बागेला तळेगाव पुणे येथील केशर बागाईतदार यांनी भेट दिली. ते गेल्या 12 वर्षापासून उत्पन्न घेतात. पण त्यांनाही मार्च महिन्यात फळ घेता आले नाही. माळीनगर येथील विनय वाघदरे यांनी यासाठी वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले.
लागवड ते उत्पादन खर्च
ससाणे यांनी आतापर्यंत आंबा लागवड आणि व्यवस्थापनासाठी एकूण दहा लाख रुपये खर्च केला आहे. तीन वर्षापूर्वी नागपूरहून लिंबोणीचे रोप आणून आंब्याच्या झाडांच्या मधल्या भागात 20 बाय 10 अंतरावर लागवड केली आहे. त्यामुळे फळझाडाचे एकत्रित नियंत्रण करता आले. यावर्षीच चांगले उत्पादन मिळाल्यास सगळाच खर्चाची परतफेड होईल, असे प्रकाश ससाणे सांगतात.
देशभरात केशरचे उत्पादन शक्य
आंबा एप्रिल मध्ये बाजारात आला तर चांगला भाव मिळेल यासाठी माझे प्रयत्न होते. त्यानुसार हे फळ मार्च अखेर बाजारात येते आहे. हापूसमध्ये साका येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या तुलनेत केशरमध्ये साका नसतो. गोडीत हापुस पेक्षाही केशर जास्त गोड आहे. त्यामुळे परदेशातून मागणी वाढत आहे. सघन लागवड व छाटणी हे तंत्रज्ञान ईस्रायल चे नसून आफ्रिकेचे आहे. केशर आंब्याचे वैशिष्ट म्हणजे तो राज्यातच नव्हे, तर देशातील कोणत्याही भागात लागवड करून उत्पादन घेता येईल.
विनय वाघदरे, कृषी सल्लागार
–
कुटुंबियाचे शेतीसाठी सहकार्य
शेतीसाठी दोन भाऊ व लहान मोठे सर्वांचे सहकार्य मिळते. शेतकर्यांना दुष्काळात उमेद देण्याची गरज आहे. शेती करताना अनंत अडचणी येत असतातच. सगळ्यात मोठी अडचण पाणी व बाजारभाव ही आहे पण त्यावर मात करण्यासाठी शेतीत तंत्रज्ञान व कष्ट करावे लागतात. जिद्द तर आपल्यापाशी असतेच. मात्र शेतीत वेळेला महत्व आहे हे प्रत्यकाने लक्ष्यात ठेऊन निरनिराळी पिके घेण्यासाठी शेतीत स्वतःला झोकून दिले तर शेती नक्कीच फायद्याची ठरते. – प्रकाश ससाणे
मो.नं. 8208471634