देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला हॉलंडच्या नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स बँकेकडून कृषीमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये कृषिमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी 120 कोटींचा अर्थपुरवठा
विखुरलेले शेतकरी दिशाहीन असतात. प्रत्येक बाबतीत ते सरकारवर अवलंबून असतात. अश्या शेतकऱ्यांना एकत्र करीत नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने मदतीचा हात दिला आहे. ज्या छोट्या शेतकर्यांना कर्जपुरवठा करणे बँकांसाठी धोक्याचे वाटत होते त्यांना सह्याद्री फार्मने मदतीचा हात दिला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येत काम केले तर शेतकऱ्यांच्या जीवनांत काय बदल घडू शकते याची प्रचिती देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या नाशिकच्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमुळे येते. त्यांच्या कामाची दखल घेत ‘एफएमओ बँकेने (नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स कं.) सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला सुमारे 120 कोटींचा (15 दशलक्ष युरो) कर्ज स्वरूपात वित्त पुरवठा मंजूर केला आहे.
‘एफएमओ’ने सह्याद्रीला केलेल्या वित्तपुरवठ्यामुळे कंपनीसाठीच नव्हे तर संपूर्ण शेतकरी वर्गाचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होणार आहे. सह्याद्री कंपनीमुळे उत्पादित कृषीमालाच्या मार्केटिंगसाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भारतीय शेतीत अधिक गुंतवणूक आवश्यक आहे. अश्या गुंतवणूकची गरज संपूर्ण देशातील कृषिक्षेत्राला आहे. कंपनीला मिळालेल्या या कर्जामुळे कृषी आणि कृषीप्रक्रिया कार्याला चालना मिळून शेतमालाची नासाडी थांबू शकेल.
कृषीमाल संकलन, साठवणूक आणि वाहतुकीसाठी गोदामांचे बांधकाम, कोल्ड स्टोअरेजसह वितरण केंद्रे आणि लॉजिस्टिक्स आणि वाहतूक व्यवस्थेसाठी रेफ्रिजरेटेड वाहने, मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये कृषिमालाचे रिटेल स्टोअर्स उभारणी आणि कंपनीच्या विद्यमान उत्पादन केंद्राचा विस्तार या कारणांसाठी हा वित्तपुरवठा वापरला जाणार असल्याचे नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स बँकने स्पष्ट केले आहे. या कर्जाच्या पाठपुराव्यासाठी दिल्लीतील अल्पेन कॅपिटल या सल्लागार कंपनीने सह्याद्रीला सहाय्य केले. ‘एफएमओ’च्या कृषी व्यवसायाच्या ग्लोबल हेड श्रीमती पीटरनल बोगार्ड यांच्या नेतृत्वाखाली स्टीव्हन डुव्हरमन, विम विएंक या अधिकार्यांनी मे 2019 मध्ये सह्याद्री कंपनीला भेट देऊन संपूर्ण कार्यपद्धती समजावून घेतली होती. या टीमने सह्याद्रीशी संलग्न प्रातिनिधिक शेतकर्यांशी त्यांच्या गावी जाऊन थेट संवाद साधला होता. त्यानंतर हा वित्तपुरवठा मंजूर करण्यात आला.
सह्याद्रीने शेतकऱ्यांना पुरवलेले उत्पादन तंत्र, अन्न सुरक्षेच्या पद्धती, ग्लोबल गॅप तंत्रानुसार उत्पादनतंत्र, सह्याद्रीशी जोडल्यानंतर शेतकर्यांवर झालेला दृश्य परिणाम, बदललेली आर्थिक परिस्थिती, द्राक्षे आणि अन्य पीक लागवड पद्धतीत झालेले बदल, द्राक्षांची निर्यातक्षम नवीन वाणं, उत्पादन व उत्पन्नात पडलेला फरक, बदललेली जीवनशैली आदी अनुभव त्यांनी शेतकर्यांच्या तोंडून ऐकले होते. सह्याद्रीने छोट्या शेतकर्यांना एकत्र करून केवळ बँकाच नव्हे तर देशभरातील शेतकर्यांपुढे एक आदर्श मॉडेल ठेवले आहे..
काय आहे नेदरलँड्स डेव्हलपमेंट फायनान्स बँक…
‘डच उद्योजकता विकास बँक’ या नावाने ओळखली जाणारी हि बँक हॉलंड सरकारच्या मालकीचा उपक्रम आहे अशीही या बँकेची ओळख आहे. बँकेचे मुख्यालय हेग शहरात आहे. कृषी उद्योग, ऊर्जा, वित्तीय संस्था, अन्न आणि जलसिंचन, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि सेवा आदी क्षेत्रांसाठी या बँकेतर्फे इक्विटी आणि कर्ज या माध्यमातून गुंतवणुकीद्वारे प्रकल्पांना वित्तपुरवठा केला जातो. भारतातील CSR फंडप्रमाणे एफएमओ बँकेचा हा एक वित्तपुरवठा सामाजिक हितजोपासल्या साठी दिला जातो. अशा प्रकारची आर्थिक पुरवठा ‘सोशल इम्पॅक्ट फंड’ स्वरूपात असतो.
सह्याद्रीच्या सोबत जुडणे शेतकऱ्याच्या फायद्याचे
सह्याद्रीशी फार्मशी जोडलेले असलेले सर्व शेतकरी चांगली प्रगती करत आहेत. सह्याद्रीच्या माध्यमातून या क्लस्टरमध्ये झालेल्या छोट्या शेतकर्यांची प्रगती व त्याचे चांगले परिणाम आम्हाला अनेक रूपांनी आम्हाला दृष्टीला पडले. सह्याद्रीने द्राक्ष उत्पादकांसोबतच अन्य पिके घेणार्या अधिकाधिक शेतकर्यांना सोबत जोडून घ्यावे, त्यांना सह्याद्रीचा हिस्सा बनवावे. हा परिवार त्यामुळे विशाल होण्यास मदत होईल. अधिक चांगली उत्पादने घेऊन ती तुम्ही निर्यात करा .
–श्रीमती पीटरनल बोगार्ड (ग्लोबल हेड, ‘एफएमओ’ अॅग्री बिझनेस)
शेतकरी कंपन्यांसाठी मैलाचा दगड ठरेल हा वित्तपुरवठा
बँकेने भारतातील शेतकरी उत्पादक कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे, ही घटना केवळ सह्याद्री फार्म्स नव्हे तर देशातील एकूण शेतकरी उत्पादक कंपनी चळवळीसाठी अभिमानास्पद आहे. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून एकत्र येऊन छोट्या व सीमान्त शेतकर्यांची एकत्रित ताकद निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. हे साध्य केल्यावर योग्य मार्केट, तंत्रज्ञान आणि भांडवलाची निर्मिती हे घटक शेतीसाठी मिळवणे सोपे जाते. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून तोट्यातील शेतीचे चित्र बदलू शकतो. शेतीकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन शेतकर्यांना मिळू शकतो. भारतीय शेतीचे अनोखे मॉडेल जगाला दाखविण्याची ताकद शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये आहे. शेतीला योग्य प्रकारे अर्थपुरवठा झाला तर शेतीला उज्ज्वल भवितव्य आहे.
-श्री. विलास शिंदे (चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स कंपनी)