मुंबई : राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून आज काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण व घाट भागात काही ठिकाणी हलका-मध्यम पावसाची शक्यता तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक जाणवणार असून जळगावसह काही जिल्ह्यांत हलक्या सरी बरसणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये आज (दि. 23 जून) रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. तसेच या आठवड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, यावर्षी संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज ला – निनाचा प्रभाव असल्याने वर्तविण्यात आला आहे.
या भागांना इशारा (दि. 23 जून)
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने (IMD) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असून हलक्या सरींची शक्यता आहे.
