जळगाव : सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट – कापूस उभळणे) हा रोग दिसून येत आहे. साधारणत: आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो.
आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते.
[metaslider id=18684]
कापसावरील आकस्मिक मर आणि उपाय योजना
* कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये.
* अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे.
* शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
* आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालील पैकी आळवणी करावी. यासाठी खालील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा.
उपाय
कॉपर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम)/ १० लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास २५०-५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.
> त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लि. पाणी) याची आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे.
सौजन्य : (तांत्रिक माहिती व सहकार्य: कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)