मुंबई – देशात सध्या तीव्र हवामानाचा अनुभव येत आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट असून, दक्षिण भारतात, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, झारखंड आणि ओडिशातही थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडीचा अंदाज आहे. नागरिकांना उबदार राहण्यास आणि खबरदारी घेण्यास सांगितले गेले आहे. उत्तर भारत गारठण्यास सुरुवात झाल्याने महाराष्ट्रातही थंडीचे आगमन झाले आहे.
राज्यातील रात्रीच्या तापमानात 4 ते 6 अंश घट
महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निवळल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. उत्तरेकडील वाऱ्याची उपस्थिती राज्यात हिवाळ्याची भावना निर्माण करत आहे. गेल्या 4-5 दिवसातच राज्यातील रात्रीच्या तापमानात सुमारे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. आता उर्वरित नोव्हेंबरमध्ये राज्यात पावसाची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान 15 ते 18 अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मुंबईतही तापमानाचा पारा 20 अंशांखाली घसरला आहे.

उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
यापुढे राज्यात आकाश स्वच्छ आणि कमी आर्द्रता राहील. उत्तर-मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा सुमारे 2 ते 4 अंश सेल्सिअसने कमी राहील. जळगावमध्ये कमाल तापमानात 2.7 अंशांची घट होऊन ते 30.8 अंश सेल्सिअस राहिले, तर किमान तापमान पाच अंशांनी खालावून 10° अशा थंडीच्या हवामानाची नोंद झाली. धुळ्यात राज्यातील सर्वात कमी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आठवडाभर तापमानाचा पारा आणखी 2 ते 4 अंशाने खालावलेला राहणार आहे. विदर्भातही दिवसासह रात्रीचे तापमान कमी राहील. बदलत्या हवामानात सर्दी, खोकल्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

* एल-निनो वर्षांत ते भारतापासून दूर उलट्या दिशेने वाहतात. त्यामुळे ला-निना वर्षांत चांगला पाऊस आणि थंडी असते, तर एल-निनो वर्षात उष्ण हवामान व दुष्काळी स्थिती असते.
बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली
21-22 नोव्हेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरावर एक तीव्र तीव्र कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पुढे चेन्नई आणि पुडुचेरीसह उत्तर तमिळनाडू किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता आहे. याशिवाय जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
• ला-नीना यंदा परत आला आहे! नोव्हेंबर ते जानेवारी या काळात उत्तर भारतात अधिक कडाक्याची थंडी राहू शकेल. त्याचा परिणाम उर्वरित भारतातील मैदानी प्रदेशावरही जाणवेल. यंदाचा हिवाळा पावसाळ्यासारखाच प्रदीर्घ आणि विक्रमी असेल.

















