मुंबई: बळीराजाच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली, मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याचं समोर आले आहे. या अपात्र लाभार्थ्यांकडून ही रक्कम परत घेण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवण्यात येत आहे. देशातील सुमारे 33 लाख अपात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील 3 लाख 55 हजार 443 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 299 कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून 78.37 कोटी रुपये परत घेतले असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारनं जे अपात्र शेतकरी पैसे परत करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात येईल, असं जाहीर केलं आहे. जे पात्र शेतकरी असतील त्यांना 6 हजार रुपयांची मदत मिळेल. इतर शेतकरी शेती करत असतील आणि ते पात्र नसतील तर त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील, असं केंद्राकडून जाहीर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत पैसे माघारी घेतले जातील,असा इशारा देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून 2326 कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत 231 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली होती. महाराष्ट्रातून 57.50 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत कोणते शेतकरी लाभ घेत आहेत याची माहिती ग्रामपंचायतीमध्ये लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर पडताळणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत 1.16 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहेत. तर, https://bharatkosh.gov.in/ या वेबसाईटवर पीएम किसान योजनेचे पैसे परत करता येतील