प्रतिनिधी / पुणे
मागील आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बहुतांश ठिकाणी नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे अजूनही सुरु आहेत. या नैसर्गिक संकटानंतर राज्यातील तपमानात कमालीची घट झाली होती. परंतु आता अजून नवीन संकट महाराष्ट्रातील जनतेवर एप्रिलच्या सुरुवातीला येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळ व अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता विदर्भ, मध्य महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे केंद्र तयार झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारपासून राज्यातील अवकाळी पावसाचे संकट दूर झाले आहे. मात्र, कोकण आणि गोव्यापासून राज्यात उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही लाट विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचे क्षेत्र व्यापू शकते. गेल्या आठवडाभरात संपूर्ण राज्याला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी झोडपले. २५ मार्च म्हणजे आजपासून राज्यात ही स्थिती बदलणार आहे. अनेक ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट वाढेल.
सध्या मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंशांवर स्थिरावला आहे. पुढील आठवड्यात तापमान चाळिशी पार जाण्याची शक्यता आहे. उत्तरेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्याचा प्रभाव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाणवू शकतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही लाट विदर्भ, मध्य, उत्तर महाराष्ट्रात त्याची तीव्र स्वरूप धारण करू शकते.