पार दिशेच्या रोखानं वाईवरून खानाच्या व्यवस्थेसाठी बाड-बिछायत, शामियाने, तंबू, राहुट्या यांचं सामान येत होतं. काबाडीच्या बैलांवरून, उंट-हत्तींवरून ते सामान आणलं जात होतं. रडतोंडीच्या घाटानं तो काफिला उतरत असता खानाचं दळ रडकुंडीला आलं. खानाच्या तळासाठी राखलेल्या जागेवर खानाचा खास शामियाना, सरदारांचे तंबू उभारले गेले. हत्तीखाना सजला. झुलणाऱ्या हत्तींच्या पायातल्या साखळदंडांचा आवाज उठू लागला. घोड्यांचा पागा सजला. उंटांचं ठाणं ठाणबंद झालं. खानाचे खासे सरदार मंबाजीराजे भोसले खानाच्या छावणीची उभारणी पाहत होते. अफजलखानाचा मुलगा फाजलखान सर्व व्यवस्थेवर नजर ठेवून होता. राजांनी कोणतीच कमतरता न ठेवाल्यामुळं फाजलखान खुशीत होता.
छावणीची सर्व व्यवस्था होताच अफजलखान वाईहून जावळीला यायला निघाला. खान पालखीतून येत होता. हजारांच्यावर शस्त्रधारी खोजे तळपत्या तेग्यांनिशी पालखीबरोबर चालत होते.
पालखी महाबळेश्वरच्या माथ्यावर आली आणि बाजी, जेधे, नेताजी खानांना सामोरे गेले. त्यांनी खानाचं स्वागत केलं. रडतोंडीच्या घाटापर्यंत तिघांनी खानांना सोबत केली.
खानांना रडतोंडीच्या घाटावर पोहोचवून, जेव्हा ते माघारी फिरले, तेव्हा जेधे बाजींना म्हणाले,
‘खान मोठा धिप्पाड आणि उग्र प्रकृतीचा दिसतो.’
‘राजांनी हा धोका घ्यायला नको होता.’ बाजी म्हणाले, ‘त्या माणसाची नजर सरळ नाही.’
अफजलखानाला पाहिल्यानंतर बाजी, नेताजी, जेधे चिंतेत पडले होते.
भेटीच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वीच महाबळेश्वरची डोंगरकडा बाजी, नेताजी, जेध्यांच्या मावळ्यांनी व्यापली होती.
बाजींनी भीमा तोडप्याला बोलावलं.
‘भिमा! कामगिरी झाली?’
भीमा हसला.
‘धनी! सारी कामगिरी झालीया. मी आनि माझी मानसं इशारत करशीला, तवा सगळ्या वाटा बंद करून दावतो. झाडं कच्ची करून ठेवल्यात. पोरानं ढकललं, तरी झाड आडवं हुईल.’
बाजींनी सांगितलं,
‘आमच्या इशारतीची वाट बघू नका. तोफेचा आवाज झाला की, साऱ्या वाटा अडल्या पाहिजेत. समजलं?’
‘व्हय, धनी!’ भीमा म्हणाला आणि लंगडत तो रानाकडं जाऊ लागला.
बाजींनी शेजारी उभ्या असलेल्या फुलाजींच्याकडं पाहिलं. ते फुलाजींना म्हणाले,
‘दादा! तुम्ही विचारलं होतं, लंगड्या-पांगळ्यांची काय गरज म्हणून! काल आम्ही साऱ्या वाटा बघून आलो. या भीमानं आणि त्याच्या साथीदारांनी बेमालूम काम केलं आहे. खानाचा एवढा फौजफाटा रडतोंडीच्या घाटानं उतरला. पण एकाला संशय आला नाही, अशी झाडं खापलून ठेवलीत. इशारत मिळताच साऱ्या वाटा पडलेल्या झाडांनी बंद केल्या जातील.
बाजींचं लक्ष कोयनेच्या खोऱ्यात लागलं होतं.
सूर्य आकाशात चढत होता. त्या सूर्यकिरणांत गर्द रानानं वेढलेली जावळी खोऱ्यातील खानाची छावणी नजरेत येत होती.
मध्यान्हीचा सूर्य कलला आणि तो पश्चिम क्षितिजाकडं जात असता तोफेचा आवाज कोयनेच्या खोऱ्यात घुमला. साऱ्या रानातून ‘हर हर महादेवss’ ची गर्जना उमटली. खानाच्या छावणीवर तुटून पडलेले मावळे दिसत होते. भीतिग्रस्त झालेले खानाचे सैनिक वाट फुटेल तिकडं धावत होते. रडतोंडीच्या घाटाच्या साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या. त्या वाटेनं धावत येणारे बाजींच्या मावळ्यांना तोंड देत होते. निराशेनं परतत होते.
घटकाभर आक्रोश, किंकाळ्यांनी सारा मुलूख गजबजून उठला आणि हळू हळू शांतता पसरली.
त्याचवेळी यशवंत बाजींच्या जवळ आला.
‘धनीs, अफजलखानाचा मुलगा फाजलखान नदीकाठनं पळून जात असल्याची वर्दी आली आहे.’
‘चलाs’ बाजींनी घोड्यावर मांड टाकली. नदीकाठ गाठेपर्यंत फाजलखान खूप पुढं गेला होता. काही वेळ बाजींनी त्याचा पाठलाग केला. शेवटी फाजलखानाचा नाद सोडून राजांच्या काळजीनं बाजी परतले.
बाजी खानाच्या छावणीपाशी आले. खानाच्या छावणीचं रूप पाहवत नव्हतं. खानाचा शामियाना, डेरा कनातीच्या दोऱ्या कापल्यामुळं कोसळला होता. तीच गत इतर तंबू-राहुट्यांची झाली होती. सुटलेले हत्ती ठाणबंद करण्यासाठी धावपळ चालू होती. भयभीत नजरेनं बघत असलेले शरणागत एका बाजूला बसवले होते. वाटेत ठायी ठायी पडलेले वीर दिसत होते. मावळे तळाचा कबजा घेत होते. बाजी, जेधे, नेताजी अभिमानानं छावणी बघत पुढं जात होते.
राजांचे एक मानकरी कमळोजी साळोखे बाजींना सामोरे आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाला सीमा नव्हती. अंगावरच्या जखमांचं भान त्यांना उरलं नव्हतं. त्यांनी बाजींना सांगितलं,
‘बाजी! राजांनी बाजी जिंकली. खान मारला गेला.’
‘ते खरं! पण राजांची तबियत?’
‘राजे जखमी झालेत, असं ऐकतो!’ कमळोजींनी सांगितलं.
‘आम्ही गडावर जातो.’
साऱ्या वाटेवर युद्धाच्या खुणा दिसत होत्या. बाजी माचीवर आले आणि त्यांची पावलं अडखळली. खानासाठी उभारलेल्या राजेशाही शामियान्याभोवती खानाच्या सरदारांची, भोयांची, रक्षकांची प्रेतं विखुरली होती. राजांचे मावळे शामियान्याभोवती पहारा करीत होते. पार तळावर खानाच्या छावणीची झालेली दुर्दशा, माचीवरची खानाची वासलात पाहून बाजींच्या डोळ्यासमोर, प्रसंग काय घडला असेल, याचं चित्र उभं राहिलं. त्यामुळं राजांच्या प्रकृतीची काळजी वाढली होती. न राहवून बाजी फुलाजींना म्हणाले,
‘राजे कितपत जखमी झालेत, कोण जाणे. आपण गडावर जाऊ.’
गडाच्या दरवाज्याखाली खानाचे सापडलेले खासे सरदार, खानाची दोन मुलं अधोवदन उभी होती.
बाजींना आठवत होतं— हेच सरदार, खानाची मुलं केवढ्या मिजाशीनं महाबळेश्वराचा डोंगर उतरली होती. तो नूर कुठल्या कुठं गेला होता. पराजयाची एक थप्पड सुद्धा माणसाला केवढी नमवते!
गडाच्या प्रथम दरवाज्याशी थबकलेल्या बाजींच्याकडं पाहत फुलाजी म्हणाले,
‘बाजी! चलायचं ना?’
त्या शब्दांनी बाजी भानावर आले. भरभर पायऱ्या चढत ते म्हणाले,
‘चला s’
गडाचं वातावरण आनंदानं भरलं होतं. बाजी, नेताजी, जेधे गडाचं बदललेलं रूप पाहत होते. जखमी मावळे जखमांची क्षती न बाळगता सुहास्य वदनानं बाजी, नेताजींचं स्वागत करीत होते. जणू त्यांनी उत्सवाचा गुलालच अंगावर झेलला होता.
गडाच्या शेवटच्या पायरीजवळ माणकोजी दहातोंडे बाजींना भेटले. माणकोजी वयानं मोठे. राजांच्या खास विश्वासातले. बाजींनी विचारलं,
‘माणकोजी, राजे कसे आहेत?’
‘सुखरूप! जगदंबेनं लाज राखली. खानानं मारलेला घाव राजांच्या मस्तकावर पडला होता. पण आतल्या जरीबख्तरामुळं राजे बचावले. तरी सुद्धा ते बख्तर तुटून राजांच्या मस्तकावर गव्हाएवढी जखम झालीच. पण काळजीचं काही कारण नाही.’
बाजी, नेताजी, फुलाजी, जेधे गडाचं वातावरण पाहत राजवाड्याकडं जात होते. गडाला उत्साहाचं उधाण आलं होतं. घोळक्या-घोळक्यांनी उभे असलेले मावळे हसत आपल्या पराक्रमाचं वर्णन करीत होते.
राजसदरेवर सारे मानकरी गोळा झाले होते. तानाजी आवेशानं सांगत होता,
‘….आनि काय! शामियान्यातून ‘दगाsदगाss’ म्हणून वरडला. जिवाचा थरकाप झाला माझ्या. तंवर राजं शामियान्याबाहीर आलेलं दिसलं. सारं अंगराखं रक्तानं भरलं व्हतं. डोईला जिरेटोप नव्हता. काय सुचंना. म्या सरळ इशारत दिली. आनि बाणकऱ्यांनी बाण सोडलं. खानाची मानसं लगोरी पडावी, तशी पटापट पडली. एकच धामधूम माचीवर उसळली. म्या बघत व्हतो ना! खान कोथळा सावारत आपल्या पालखीकडं जात व्हता. तवर संभाजी कावजीनं भोयांचे पाय तोडले. पालखी पडली. आमी माचीवर गेलो. एकच धुमाळी झाली. बगता-बगता खानाची मानसं पडली. तवर राजं गडावर गेलं व्हतं…’
सारे भारावून ऐकत होते. बाजींची अवस्था तीच झाली होती.
-आणि त्याच वेळी वाड्यातून राजे सदरेवर आले.
बाजी डोळे भरून ते रूप पाहत राहिले.
भरजरी अंगरखा राजांनी घातला होता. अत्तराचा सुगंध दरवळत होता. डोक्याला राजपूत पगडी शोभत होती. राजांच्या चेहऱ्यावर सदैव विलसणारं स्मित तेच होतं. साऱ्यांनी राजांना मुजरे केले.
राजांना पाहताच बाजी पुढं धावले. त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. भर सदरेवर भरल्या डोळ्यांनी त्यांनी राजांना मिठीत घेतलं.
भावनाविवश झालेले बाजी गुदमरलेल्या आवाजात म्हणाले,
‘राजे! थोर पराक्रम केलात. येवढं मोठं संकट अंगावर घ्यायला नको होतं.’
‘संकट केव्हाही मोठंच असतं, बाजी. ते बोलवून नव्हे, आपोआप येतं. खान आमच्यावर बळाच्या विश्वासावरच चालून आले होते.’
बाजी हसले. म्हणाले,
‘बळाचा विश्वास फक्त जनावरंच बाळगतात.’
‘बाजी, परमेश्वरानं माणसाला बळाबरोबरच बुद्धीही दिली आहे. जनावरांना जे अवगत नाही, ते वरदान माणसाला मिळालं आहे. काल, आज आणि उद्या याची जाणीव फक्त माणसाला मिळाली, ती त्याच्या बुद्धीमुळं. बळापेक्षा त्या बुद्धीवर अधिक विश्वास ठेवावा.’
‘खानाला का बुद्धी नव्हती? तो पूर्वीचा वाईचा सुभेदार. या मुलखाचा जाणकार. राजकारणातला तरबेज. कुटिल नीतीचा जाणता सेनापती. तो फसला कसा?’
राजे हसले. त्यांनी सांगितलं,
‘कसा फसला! रावणाचा पराभव का झाला? कौरवांचा दिमाख कोणता होता? बाजी, त्याला एकच उत्तर आहे, आंधळा अहंकार!’
‘अहंकार?’
‘हो, अहंकार! खुळी स्तुतिप्रियता! आम्ही खानाला जाळ्यात आणण्यासाठी भित्रेपणाचं सोंग घेतलं. खान त्यानं शेफारला, लालचावला. येणाऱ्या पावसाची त्याला भीती होती. अफाट सैन्याचं पाठबळ आणि आपल्या ताकदीचा गर्व यांमुळंच त्यानं आम्हांला एकाकी भेटण्याचं ठरवलं.’
‘त्याचं बळ का साधं! वीस हजारांचा फौज-फाटा घेऊन तो आला होता.’ फुलाजी म्हणाले.
बाजींनी सांगितलं,
‘तेवढाच फौजफाटा नव्हता.’
‘मग?’ राजांनी विचारलं.
बाजी हसले,
‘राजे, आदिलशाहीच्या दरबारी जासलोड गड आमचा झाला, याची नोंद नाही. तो गड ते आपलाच समजतात. प्रत्येक आदिलशाही गडाला बादशहाचं फर्मान आलं आहे.’
‘कसलं फर्मान?’
‘प्रत्येक गडावर हजाराची शिबंदी असते. त्यातली फक्त शंभर गडावर ठेवून, उरलेली खानाच्या मदतीला पाठवावी, असं ते फर्मान आहे. त्यानुसार खानाचं बळ अधिक वाढलं असणार.’
बाजी सांगत असलेल्या वार्तेनं राजांचे डोळे चमकले. त्यांच्या ओठांवर वेगळंच हास्य प्रकटलं. अधीरतेनं त्यांनी विचारलं,
‘कसलं फर्मान आलं, म्हणालात? परत सांगा.’
‘आदिलशाहीच्या प्रत्येक गडावर हजाराची शिबंदी असते. त्यापैकी गडावर फक्त शंभर ठेवून, उरलेली शिबंदी खानाच्या मदतीला पाठवावी, असं ते फर्मान आहे. हवं,तर देशमुखांना विचारा.’
राजांनी देशमुखांकडं पाहिलं. त्यांनी होकारार्थी मान हलवली. राजांच्या मुखावरचा आनंद त्यांना लपवता आला नाही. राजांनी सांगितलं,
‘बाजी, खानाचे सरदार गडाखाली आले आहेत. त्यांना बाइज्जत मोकळे करून आम्ही येतो.’
‘राजे, आपण थोर पराक्रम केलात, पण आज आम्ही शरमिंधेपणानं आपल्या समोर उभे आहोत.’
‘ते कशासाठी?’ राजांनी आश्चर्यानं विचारलं.
‘खान गारद झाला, तोफेचा आवाज उठला. महाबळेश्वराकडं धावत येणारी खानाची माणसं आम्ही थोपवली. पण या गर्दीत खानाचा मुलगा फाजलखान, हसन, याकूब आणि अंकुशखान नदीकाठनं गर्द रानातून पळून गेले, त्यांना खंडोजी खोपड्यानं वाट दाखवली. आम्ही पाठलाग केला, पण रानातून त्यांना गाठणं कठीण गेलं.’
राजांनी बाजींच्या खांद्यावर हात ठेवला.
‘बाजी, तुम्ही केलंत, तेच योग्य केलंत, जरी त्यांना पकडून आमच्या समोर आणलं असतं, तरी त्यांना आम्ही सोडून दिलं असतं. आता वैर राहिलय्, ते घरभेद्यांचं. तो खंडोजी खोपडा फार काळ आमच्या हातून सुटणार नाही. आम्ही येतो, तुम्ही सदरेवरुन जाऊ नका.’
राजे गडाखाली जाण्यासाठी उतरले.
सदरेवर परत मोकळेपणानं कथा रंगू लागल्या.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )