किशोर कुळकर्णी
आपल्या आयुष्यात काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे, तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. असेच काहीसे सावखेडा येथील युवक प्रशांत डिगंबर पाटील यांच्या जीवनात घडले. कोरोनाच्या काळात वडिलांचे निधन झाले, शेतीबाडी सांभाळणारा एकमेव वारस शिल्लक राहिल्यामुळे झगमगते कॉर्पोरेट विश्व, अल्पावधीतच वैश्विक पातळीवर स्वतःचा ठसा उमटविणारी स्वतःची आयात-निर्यात कंपनी सोडून शेती करण्यासाठी यावे लागले. ज्या बोटांनी लॅपटॉप हाताळले जात होते त्याच बोटांनी म्हशीचे दूध काढावे लागते इतका कमालीचा बदल त्यांनी जीवनात अनुभवला.
टाय-कोट हा पहेराव सोडून ब्यू जिन्स त्यांना घालावी लागली. प्रशांत यांच्या यशाचे गमक सहज सांगून जातात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा, कारण ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची मनःशक्ती व इच्छाशक्ती असेल त्यालाच परमेश्वर संघर्ष करायची संधी देत असतो, असे माझे वडिल मला सांगायचे. वडिलांची ही शिकवण मी कायम अनुसरली आणि आपल्या परिस्थितीला हसून स्वीकारले… हे माझ्या यशाचे गमक आहे.
मी वडिलांच्याबाबत सांगायला गेलो तर प्रशांत सांगे वडिलांच्या कीर्ती असे ठरेल, परंतु जैन इरिगेशनचे उच्च कृषितंत्रज्ञान, स्वयंचलीत ठिबक सिंचन प्रणाली यांचा स्वीकार करून त्याचप्रमाणे टिश्युकल्चर केळी, जेव्ही पांढरा कांदा करार शेती यामध्ये सहभागी होऊन जळगाव तालुक्यातील किनोद-सावखेडा खुर्द पंचक्रोशीत डिगंबर दादा म्हणून नावलौकीक मिळालेले ते प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी होते. मी शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी आमच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये त्याकाळी जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन बसवून घेतले होते. गावात टिश्युकल्चर केळीच्या लागवडीस वडिलांनी सुरवात केली. पारंपरिक केळी आणि टिश्युकल्चर केळी लागवडीचे फायदे काय असतात याबाबत वडिलांना कल्पना असल्याने त्यांनी टिश्युकल्चर केळीची लागवड केली. आमच्या भारी, भरकाळीच्या जमिनीत केळी उत्तम पिकू लागली. दुपटीहून अधिक आणि केवळ अकरा महिन्यात काढणीला येणारी गुणवत्तेची केळी हे वैशिष्ट्य असल्याने केळीला भाव देखील चांगला मिळत असे. जैन इरिगेशनचे के.बी. पाटील, डॉ. अनिल पाटील यांचे केळीबाबत तर गौतम देसर्डा, श्रीराम पाटील, डॉ. अनिल ढाके यांचे पांढरा कांदा याबाबत ते सतत मार्गदर्शन घेत असत. पारंपरिक केळी लागवडीपासून ते टिश्युकल्चर केळीकडे वळले, त्यामुळे ते तंत्रज्ञान स्वीकारणारे तर होतेच, परंतु ह्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर त्यांनी आपल्या शेतीमध्ये करून घेतला. ते जैन इरिगेशनच्या शेतकरी मेळावे, प्रदर्शने आणि डॉ. आप्पासाहेब पवार पुरस्कार वितरण सोहळ्यास आवर्जून जात असत. जैन कंपनीच्या कृषितज्ज्ञांशी त्यांचा नियमीत संवाद होत असे. शेती हे वडिलांचे क्षेत्र आणि माझे कॉर्पोरेट विश्व तर फारच निराळे होते. अनेकदा शेतीमध्ये नुकसान, तोटा होत असे, परंतु वडिलांच्या चेहर्यावर कधीही काळजी दिसली नव्हती.
मी एकुलता एक असल्याने मला मात्र शेतीचे बेसिक देखील ठाऊक नव्हते. माझी आई सद्गुरुंच्या बैठकीला जाणारी, तिचा सगळा कटाक्ष शिस्तीबाबत असायचा. माझं बालपण सुखवस्तू मुलांसारखे गेले. मला दोन बहिणी नी मी एकुलता एक, शिवाय सर्वात लहान असल्याने घरातील सर्वांच्या लाडाचा होतो. डिगंबर दादांनी प्रशांतची हुशारी बघून त्यांना लहानपणापासून मुंबईला शिक्षणासाठी पाठविले. आठव्या इयत्तेपासून जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या निवासी शाळेत वडिलांनी माझा प्रवेश करून दिला. वडील पुढारलेल्या विचारांचे तर होतेच, परंतु सद्य परिस्थितीला जुळवून घेणारे होते. प्रवेशासाठी 1999 मध्ये शाळेला रोखीने पैसे न देता संपूर्ण वर्षाची एक रक्कमी फी चेकने देणारे ते कदाचित पहिलेच शेतकरी पालक असावेत. इतक्या लाडाकोडात वाढल्यामुळे लहानपणी मी वडिलांबरोबर शेतीत मज्जा म्हणून अनेकदा गेलो होतो, परंतु ती शेती मला करावी लागेल असे स्वप्नात देखील वाटत नव्हते.
जैन इरिगेशनची ग्रॅण्डनाईन टिश्युकल्चर केळी, चिया सीड, अश्वगंधा, सामान्यपणे दुपटीपेक्षा अधिक किंमत असलेला, मधूमेहावर औषधी गुणधर्म असलेला सोना मोती गहू असो की पपई, टरबूज, हरभरा, बाजरी असो, जे पिकवायचे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचे असा मनाशी पक्का निश्चय करून प्रशांत एका वेगळ्या स्पिरीटने शेतीमध्ये काम करतात. 23 मार्च 2020 ला पहिला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यावेळी प्रशांत पुण्यात होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुण्यातच चीन स्थित असलेली इ-कॉमर्स क्षेत्रातली नावाजलेली कंपनी, भारतात ज्याद्वारे ऑनलाईन खरेदी विक्री होते, अशी कार्यरत कंपनीत ते सेल्स ते मॅनेजर अशी प्रगती केली. त्यांच्या समवेत प्रतिक उमरानिया हे त्यांचे सहकारी होते. दोहोंना चांगला अनुभव प्राप्त झालेला होता. क्लायंट हे पाटील व उमरानिया यांच्याशिवाय व्यवहार करत नसत. दोहोंनी विचार करून स्वतःचे विश्व निर्माण करण्याचा विचार केला. 2017 मध्ये त्यांनी मएरीू खाशिुफ नावाची ईकॉमर्स कंपनी स्थापन केली. उत्तम सेवा, परवडणारे दर आणि प्रामाणिकता या त्रिसुत्रीवर त्यांनी प्रगतीची घोडदौड सुरू केली. पुणे येथे कार्यालय होतेच, परंतु गुजरातच्या आयात निर्यातीच्या दृष्टीने बंदर सोयीचे ठरावे हा दूरदृष्टीने विचार करून राजकोट येथेही त्यांनी इझी इम्पेक्सचे कार्यालय थाटले होते. 22 ऑगस्ट 2020 मध्ये आई – वडिल दोहोंना कोरोनाची लागण झाली. आम्ही उभयता पतीपत्नी पुण्याहून मोठ्या मुश्किलीने जळगावला पोहोचलो. अशातच पत्नीला दिवस गेल्याची गोड बातमी कळालेली असल्याने पत्नीची विशेष काळजी घेणे ओघाने आलेच. त्यामुळे तिला माहेरी वाघळूद येथे पोहोचविण्यात आले. उर्वरित आम्ही तिघांनी कोरोनाच्या दोन्ही टेस्ट केल्या. त्यात आम्ही तिघेही पॉझिटीव्ह निघालो. त्यामुळे होम क्वारंटाईन झालो. आमच्या बहिणीचे दीर डॉक्टर आहेत त्यांनी देखील आम्हाला वैद्यकीय सल्ला दिला. त्यांनीच आमच्या निदर्शनास आणून दिले की, आईचा स्कोअर खूपच कमी झालेला असून तिला जळगावला पुढील इलाजासाठी दाखल करणे अत्यावश्यक आहे. आईला अनेक व्याधी असल्याने तिची रोग प्रतिकारक्षमता कमी झालेली होती. त्यामुळे तिची प्रकृती जवळजवळ चिंताजनक होती. वडिलांना कोरोनाची तेवढी तीव्र लक्षण नव्हती. आईच्या सहकार्यासाठी, आधारासाठी वडील तिच्यासोबत दवाखान्यात अॅडमीट झाले. आईची प्रकृती ठणठणीत झाली, परंतु मी वडिल गमावले. वडिलांना श्वसनाचा अधिक त्रास झाला. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सजग असलेल्या वडिलांना अंतीम श्वास घेत असताना पाहताना माझे हृदय पिळवटून जाई. इलाजामध्ये कोणतीही उणीव ठेवायची नाही, भले कितीही खर्च आला तरी चालेल असा मी मनात पक्का निश्चय केला, परंतु वडिलांना वाचविता आले नाही. 17 सप्टेंबर 2020 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एकटे वडील 19 – 20 बिघ्यांकडे बघायचे, सांभाळून घेत असत. आमची वडिलोपार्जित 11 बिघे, मोठ्या काकांची 3 बिघे आणि भाड्याने केलेली 5 बिघे जमीन आहे. ते सर्व क्षेत्र उघडे पडले, ओस पडले. ते गेल्यावर पिक उभे होते, गुरे-ढोरे होते. त्यांच्याकडे कोण बघणार? मोठे काका आधीच वारले होते त्यामुळे सर्व वडील सांभाळत असत. वडिलांच्यानंतर मोठ्या काकू, आई आहेत, परंतु कर्ता पुरुष म्हणून मी एकमेव शिल्लक राहिलेलो. शेतीचे क्षेत्र कमी राहिले असते, व्याप मोठा नसता तर कुणाला तरी देता आले असते व आईला पुण्यात सोबत घेऊन जाता आले असते. मनाशी असा ध्यास घेतला की, आता काळी आई, मोठी आई व जन्मदात्री यांची जबाबदारी स्वीकारावी व आपली जबाबदारी पार पाडावी. या सोबतच वर्क फ्रॉम होम देखील करता येईल. मनोज पाटील सर जे माझे जिजाजी आणि माझी बहीण सोनुदिदी माझ्या पाठीचा कणा आहे. त्यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन वारंवार लाभत असते. जिजाजी चोपडा येथे असतात व त्यांचा शिक्षकी पेशा आहे.
वडिलांचे क्रियाकर्म आटोपल्यावर मी शेतीमध्ये लागलो. माझ्या जीवनात आईला हिडन हिरो मानलेले आहे परंतु माझी पत्नी सौ. दिपाली देखील माझ्या प्रत्येक सुख-दुःखाला खांद्याला खांदा लावून उभी राहिली. ममाझे पती हेच माझे विश्वफ हा पत्नीचा दृष्टीकोन आहे. तिने देखील मला मानसिक बळ दिले. माझे वडिल गेल्यानंतर महिन्यांनी आम्हाला पुत्ररत्न झाले. वडिलांचा ज्या नक्षत्रावर जन्म झाला त्या नक्षत्रावर त्याचाही जन्म झाला. वडिलांना जी जन्मखूण होती तीच आणि त्याच जागेवर त्याच्या शरीरावर देखील जन्मखूण तो घेऊन आला. त्यांचा पुनर्जन्म आहे, असे सांगताना अतिशयोक्ती वाटेल परंतु योगायोग आहे.
घरातल्या घरात लॅब उभारून पाच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या “कॉर्डीसेप्स मशरूम”चे उत्पादन
नवीन पीकांचा धांडोळा
पारंपरीक पिकांच्या जोडीला काही नवीन करता येईल का असा ध्यास प्रशांत यांना सतत लागलेला असतो. त्यांच्या वाचण्यात चिया सीड बद्दल वाचण्यात आले. 40 ते 50 हजार क्विंटल भाव असलेले हे पीक आपल्या शेतात लावायचे व प्रयोग करून बघायचा असे प्रशांत यांनी ठरविले. त्यासाठी इंटरनेटची मदत घेऊन चिया सीडची करार शेती करून घेणारी आयुर्वेदीक कंपनी त्यांनी शोधून काढली. त्यांच्याकडून शेती कशी करतात त्याबाबत समजून घेतले. त्यात उडी घेतली. प्रयोगिक तत्त्वावर त्यांनी चिया सीड लावली फक्त तीन महिन्यांमध्ये येणारे हे पीक कमी पाण्यावर तर येतेच परंतु जन जनावर त्यांना तोंड लावत नाही. त्यामुळे खर्च वजा जाता सुमारे अडीच तीन लाख रुपयांचे चिया सीड त्यांच्या घरी आहे.
उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट शेती करण्याकडे भर
वडिलांच्या हातची टिश्युकल्चर केळी व अन्य पिके काढल्यावर मी 3 बिघ्यात हरभरा लावण्याचे ठरविले. युट्युब, कृषिमासिके, प्रकाशने आणि जैन इरिगेशनमध्ये जैन हिल्सच्या शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रास भेट देऊन सर्व विचाराअंती हरभरा पेरण्याचे मी निश्चित केले होते. आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने बियाण्यांवर कुठलीही प्रक्रिया न करता तसेच पेरले जात असत. मी मात्र हरभर्याच्या बियाण्यावर प्रक्रिया करून मगच ते लावायचे ठरविले. मी काय करत आहे हे गावातील इतरांचे बारीक लक्ष होते. मी बियाण्यावर प्रक्रिया म्हणून ट्रायकोडर्मा चोळले. प्रक्रिया केल्याने बियाण्यांची उगवण सुयोग्य झाली पर्यायाने चांगले पीक आले.
त्यांनी दुसरी महत्त्वाची स्मार्ट गोष्ट अशी केली की, घर ते शेती असे 10 कि.मी. अंतर आहे. वीजेची टंचाई, भारनियमन यामुळे रात्री वीज उपलब्ध असल्याने अर्ध्या रात्री विजेचा पंप चालू करण्यासाठी 10 कि.मी. जावे लागे. शिवाय रात्री अपरात्री वन्यजीव, इतर गोष्टींची भीती त्यामुळे घरी बसल्या विजेचा पंप सुरू किंवा बंद करता येतो का किंवा कसे? मध्येच एक फ्युज नसतो विजेचा पंप तर सुरू आहे परंतु सध्याच्या चालू स्थितीची माहिती काय आहे याबाबत शेतकर्याला काहीही कळत नाही. विजेचा पंप सुरू-बंद करायचा सिमकार्ड असलेला एक डिवाईस शेतात बसवून घेतले त्यामुळे बसल्या जागी विजेच्या पंपाची हाताळणी तर करता येतेच परंतु सध्या काय स्थिती आहे त्याबाबतची माहितीही ज्ञात होते. ते डिवाईस मला खूप परवडते कारण वर्षभरात जितका खर्च जाण्या येण्यात झाला त्या खर्चात ते डिव्हाईस शेतात बसले. ही स्मार्ट पद्धत अवलंबली आहे.
ठिबक सिंचनाच्या नळ्या आतून बाहेरून स्वच्छ करण्यासाठी स्वतःचा वेगळा फंडा त्यांनी अवलंबला. आतुन नळी स्वच्छ करण्यासाठी अॅसिड ट्रीटेड सोल्युशन टाकीतून सोडले. नळीचा यू आकार होईल अशा पद्धतीने दोन्ही बाजुने उंच असे वाय आकार असलेले जमिनीवर उभारले व बाहेरची नळी स्वच्छ धुण्यासाठी मोठे घमेले ठेवले अशा पद्धतीने काही मिनिटांमध्ये कैक मीटरची ठिबकची नळी आतून बाहेरून स्वच्छ होते. कमी श्रमात स्मार्ट पद्धतीने हे काम सहज होते त्यामुळे मजूर देखील खूश असतात.
उच्च शिक्षित असल्याने त्यांनी असे अनेक छोटे छोटे शेतीचे प्रयोग अवलंबलेले आहेत. फवारणी सहज होण्यासाठी तीन चाकांची वैशिष्ट्यूपूर्ण डिझाईन त्यांनी केलेली आहे व त्याच्या पूर्णत्वाकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. अशा पद्धतीने निरनिराळे प्रयोग त्यांनी शेतीत केलेले दिसतात.
भारतीय शेतीचा चेहरामोहरा, भवितव्य बदलून टाकतील असे 5 स्टार्ट-अप्स
बिगे खर्च उत्पन्न
टरबुज 3 98,000 रू. 3,20,000 रू
केळी 4 बिगे 1,30,000 रू. 4,40,000 रू.
हरभरा 3 बिगे 22,000 रू. 1,50,000 रू.
बाजरी 7 बिगे 26,000 रू. 2,05,000 रू.
चिया 3 बिगे 60,000 रू. 2,40,000 रू.
अश्वगंधा 1 एकर 35,000 रू. 42,000 रू.
काही वेळा अनुभव नसताना नुकसान होते परंतु ते नुकसान थोडे का होईना भरून काढता यावे याकरीता निर्णय सुयोग्य घ्यावे लागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत यांची अश्वगंधा लागवड होय. त्यांनी पपईची लागवड केली खरी परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळणार नाही, पपई चांगली होणार नाही हे आधीच ओळखले होते. किमान झालेला खर्च तरी भरून निघावा म्हणून पपईमध्ये आंतरपिक म्हणून त्यांनी अश्वगंधाची लागवड केली व ती यशस्वी करून दाखविली. टरबूज लागवड देखील अशीच म्हणता येईल. त्यांनी केळी लागवड केल्या, काही क्षेत्रात कुकुंबर मोझॅकचा अटॅक आला होता. काही झाडांमुळे संपूर्ण बाग काढावी लागते की काय अशी चिंता त्यांना लागली होती. ज्या केळीच्या झाडांना कुकुंबर मोझॅकचा अटॅक आलेला असे संपूर्ण झाड त्यांनी काढून टाकली व ती एका खोल खड्ड्यात बुजली कारण बागेत त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्यांनी त्वरेने, योग्य निर्णय घेऊन आपली बाग वाचविली. शेती हे अनिश्चितता असलेले क्षेत्र आहे दररोज नवे आव्हाने असतात. कधी निसर्ग निर्मित, मानव निर्मीत अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ज्ञान हे कधीच वाया जात नाही. एक्सपोर्ट इंम्पोर्टचा अनुभव व ज्ञान याच्या जोडीने भविष्यात माझा व ह्या परिसरातील शेतकर्यांच्या प्रगतीसाठी भविष्यात निर्यातीच्या दृष्टीने ठोस काही तरी करण्याचा त्यांचा मानस असून स्वतःच्या प्रगतीसमवेत पंचक्रोशीतील शेतकर्यांचाही विकास साध्य होऊ शकतो ही त्यामागची भूमिका!
– किशोर कुळकर्णी, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन जळगाव
Comments 1