Home हॅपनिंग ऐन खरिपात खत का महागले..??

ऐन खरिपात खत का महागले..??

मुंबई – भारत 90 टक्के रॉक फॉस्फेटच्या आयातीवर अवलंबून आहे. जो डीएपी आणि एनपीके खतांच्या निर्मितीसाठी एक प्रमुख कच्चा माल आहे. भारतीय शेतकऱ्यांना अजूनही फटका बसत आहे. भारताचे खत आयात अवलंबित्व मोठे असल्याने आपल्या खरीप हंगामात बहुतेक ठिकाणी खत पुरवठा व्यवस्थापनाचे बारा वाजल्याचे चित्र आहे. भारतातील खतांच्या पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकूणच खरीप हंगामालाच त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

रुपया कमकुवत झाल्याने किंमती वाढल्या
या 12 दिवसांच्या युद्धामुळे भारतीय रुपया कमकुवत झाला, ₹86.10 प्रति डॉलरवर पोहोचला. त्यामुळे आयात, विशेष करून खत, DAP, फॉस्फेट, कच्चे तेल महागले. इराण, सऊदी, इस्राईल, मोरोक्को, इ. या देशांमधून DAP, पोटॅश, फॉस्फेट, सल्फर मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते. भारत नत्र (Urea), स्फुरद (DAP, फॉस्फेटस्), पोटॅश (MOP) यातील बहुतांश खतं इराणसह खाडी देशांतून आयात करतो. रुपया घसरल्याने हा व्यवहार महाग झाला. पर्यायाने आयात आणि शेवटचा घटक असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत माल पोहोचताना त्यात मोठी भाववाढ झाली. त्यातच चीनने DAP खत निर्यात थांबवली, त्यामुळे उपलब्धता कमी आणि किंमतीत आणखी वाढ झाली.

समुद्री वाहतूक बंद झाल्याने कच्च्या मालाला उशीर
इस्त्राईल, इराण या देशातून खतांचे आयात मार्ग असलेले रेड सी, हॉर्मुझ बंदरातून वाहतूक विस्कळीत झाली, शिपमेंट्स उशीरा पोहोचल्या. फॉस्फेट, फॉस्फोरिक ॲसिड हे रॉ मटेरियल्स उशिरा पोहोचले आणि महाग मिळाले. युद्धामुळे वाहतुकीवर थेट परिणाम झाल्याने शिपिंगचा खर्च प्रचंड वाढला; विमा रेट्स स्पाइक्स (महाग) झाले. ‘मिडल ईस्ट’ तणावामुळे खत आयात वेळेत पोहोचली नाही. खातांसाठीच्या कच्च्या मालाच्या किंमती उच्चांकी पातळीवर पोहोचून DAP, MOP साठी जागतिक भाव वाढले. त्यामुळे भारतात खतांच्या किमती वाढण्याचा फटका अजूनच बसण्याची शक्यता आहे.

खतांचा तुटवडा, खरीपाला थेट फटका:
खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना वेळेवर आणि भरपूर खत न मिळणे म्हणजे पीकांची वाढ थांबते किंवा अपुरी होते. सध्या गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, यूपी, बिहार—अशा मोठ्या राज्यांत खतांचा मोठा तुटवडा अनुभवला जातोय. काही भागांत दुकानासमोर खत खरेदीसाठी मोठ्या रांगा दिसत आहेत. ब्लॅकमध्ये विक्रीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे. महाराष्ट्रात, विशेषतः खरिपाच्या सुरुवातीला, खताच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या, ब्लॅकमध्ये विक्री झाली अन् किमतीही वाढल्या.

गेल्या 2 वर्षांत तीन पट पुरवठा घट
2025 च्या खरीप हंगामासाठी भारताचा सुरुवातीचा डीएपी साठा 12.4 लाख टन होता, जो 2024 मध्ये 21.6 लाख टन आणि 2023 मध्ये 33.2 लाख टन होता. या घटत्या बफर स्टॉकमुळे भू-राजकीय तणावांना अधिक धोका निर्माण झाला आहे.

 

फॉस्फेटने बिघडवले डीएपी, एनपीके खतांचे गणित
भारत 90 टक्के रॉक फॉस्फेटच्या आयातीवर अवलंबून आहे, जो डीएपी आणि एनपीके खतांच्या निर्मितीसाठी एक प्रमुख कच्चा माल आहे. शेतकरी म्हणतात की, ते आता खतांवर जवळजवळ दुप्पट खर्च करत आहेत, कारण उपलब्ध पर्याय डीएपीइतके चांगले काम करत नाहीत. डीएपीमध्ये भरपूर फॉस्फरस असते, जे कापसासारख्या पिकांना मजबूत मुळे वाढविण्यासाठी आवश्यक असते. तथापि, डीएपी मिळविणे कठीण असल्याने, शेतकरी कमी फॉस्फरस असलेली इतर खते वापरतात. याचा अर्थ असा की, समान परिणाम मिळविण्यासाठी त्यांना अधिक खत पिशव्या खरेदी कराव्या लागत आहेत.

चीनसह अन्य देशांचे धोरण आगीत तेल ओतणारे:
चीनने या हंगामात खत निर्यात मर्यादित केली. त्यामुळे जागतिक बाजारात उपलब्धता आणखी कमी झाली. रशिया-युक्रेन युद्धामुळेही खत विशेषतः युरिया, अमोनियम नायट्रेट पुरवठा मर्यादित झाला आहे, इतर पर्यायही महागले आहेत. शेतीमधील सर्वच गोष्टी महागल्याने अंतिम उत्पादनाचे म्हणजे धान्य, भाजीपाला, तेलबिया यांचे भावही वाढतात, आता शहरात ती महागाई दिसू लागली आहे. फळ आणि भाज्यांची आयात-निर्यातही या मार्गांवर अजूनही विस्कळीत असल्याने मार्केटमध्ये किंमतीतील अनिश्चिता कायम आहे. छोटे व मध्यम शेतकरी, खास करून खत व कच्चा माल महागल्याने, सगळ्यात जास्त त्रस्त आहेत.

 

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

 

बासमती तांदूळ निर्यातीला फटका
इराण हे भारतीय बासमती तांदळाचे मोठे ग्राहक आहे. सध्या ऑर्डर थांबल्या आहेत, दाम न मिळाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तांदळाचे दर ₹75–80 प्रती किलो वर घसरले आहेत. शिपिंग, विमा खर्चात 15-20% वाढ झाली आहे. बंदर आघात आणि ॲग्री-शिपमेंट्स मध्ये गंभीर अडचणी अजूनही कायम आहेत. भारताने 2024-25 मध्ये इराणला 6,400 कोटींचा बासमती तांदूळ निर्यात केला होता. याशिवाय, , 11,200 कोटींच्या अन्य वस्तू, जसे की – सोयमिल, चहा, ड्रायफ्रूट्स भारतातून निर्यात झाले होते. हे सगळे सध्या संकटात आहे. पंजाब, हरयाणा, यूपीमध्ये सर्वाधिक बासमती उत्पादक शेतकरी व निर्यातदार आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम
रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेल, गॅस व खतांच्या, विशेष: पोटॅश, युरिया, एनपीके यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात खत व इंधन आयात होत असल्याने कृषी इनपुट्सचे खर्च वाढले आहेत. शेतकऱ्यांसाठी अर्थिक ताण, उत्पादन खर्च वाढला आहे. एकूण खाद्यपदार्थ महागल्याने ग्रामीण व शहरी महागाईही वाढत आहे. बासमतीबरोबरच सोयमिल, चहा व ड्रायफ्रूट्स उत्पादकांवर आघात झाला असून व्यावसायिक शाश्वतता धोक्यात आली आहे. दुसरीकडे, जैविक पदार्थ, गहू, प्रोसेस्ड फूड, कडधान्य याच्या निर्यातीला फायदा झाला असून त्या मागणीत मोठी वाढ नोंदविली जात आहे.

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇