पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन (International Agri – Hackathon) एक ते तीन जून दरम्यान कृषी महाविद्यालय, पुणे मैदानावर भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या अनोख्या उपक्रमात देशभरातील तरुण तंत्रज्ञ, स्टार्टअप्स, उद्योगजगतातील नेते, शासकीय अधिकारी एकत्र येऊन कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर तांत्रिक, प्रभावी आणि खर्चिक दृष्ट्या योग्य असे उपाय शोधणार आहेत. ही कोणतीही स्पर्धा नसून स्मार्ट, शाश्वत व तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीकडे वाटचाल करणारी एक चळवळ आहे.
1800 हून अधिक अर्ज, 140 जणांची निवड
या उपक्रमात आजपर्यंत 1800 जणांनी सहभाग नोंदवला असून 560 जणांनी आपले प्रेझेंटेशन सादर केले आहे. यामधून 140 जणांची अंतिम निवड करण्यात आली असून, 1 ते 3 जून दरम्यान हे सहभागी उद्योजक, नवकल्पक आणि शास्त्रज्ञ आपले उपाय प्रत्यक्ष सादर करणार आहेत.
प्रमुख मान्यवरांचा उपस्थितीत भव्य सोहळा
या ऐतिहासिक कृषी हॅकेथॉनमध्ये भारत सरकारचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, तसेच राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त हे मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कृषी समस्यांवर स्मार्ट उपाय
या हॅकेथॉनमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर स्मार्ट आणि शाश्वत उपाययोजना मांडल्या जाणार आहेत. त्यामध्ये –
मृदा व्यवस्थापन
उत्पादनवाढीसाठी नवतंत्रज्ञान
पाणीटंचाई आणि त्यावरील उपाय
हवामान बदलाचा परिणाम
जैविक व हवामान आधारित शेती
शाश्वत शेतीसाठी नवकल्पना
या विषयांवर सखोल चर्चा होणार असून नव्या तांत्रिक उपाययोजना शेतीला अधिक सक्षम बनवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रत्येक विभागातील विजेत्यांना मोठी पारितोषिके
ही स्पर्धा आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये होणार असून, प्रत्येक विभागातील विजेत्यांना २५ लाख रुपये आणि उपविषय गटातील विजेत्यांना १५ लाख रुपये अशी भरीव पारितोषिके दिली जाणार आहेत.
या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. कृषी क्षेत्रासाठी ही एक क्रांतिकारी पायरी ठरणार असून नवतंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या जोरावर शेतकऱ्यांचे भविष्य घडवण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
