तांबे कुटुंबाचे शेतीत विविध पीक प्रयोग
श्रीरामपूर तालुक्यातील तांबेवाडी येथील सोपान रावसाहेब तांबे यांची आकरा एकर शेती. त्यांनी मुलांच्या मदतीने शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादनात वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षापासून मल्चिंगचा वापर करुन टरबुजाचे उत्पादन घेतात. डाळिंबासाठीही ते मल्चिंगचा वापर करतात. मल्चिंगचा वापर केल्यामुळे तांबे यांना नियंत्रित सिंचन पद्धतीने चांगले उत्पादन घेता येत आहे. कांदा बिजोत्पादनही ते घेतात. संरक्षित पाण्यासाठी त्यांनी शेततलावही केलेला आहे.
तांबेवाडी येथील सोपान रावसाहेब तांबे हे प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांची वडिलोपार्जित अकरा एकर शेती आहे. त्यात ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांना शेतीच्या यशस्वीतेमध्ये राहुल, अतुल, कुणाल या तीनही मुलांचा महत्वाचा वाटा आहे. तिघांचेही पदवीपर्यत शिक्षण झालेले आहे. तांबे यांच्या परिसरात कालव्याचे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची बर्यापैकी उपलब्धता असते. मात्र तरीही नियंत्रित पद्धतीने पाणी देण्यावर त्यांचा भर आहे. त्यासाठी ते ठिबक, तुषार सिंखनाचा सर्व क्षेत्राला वापर करतात. सोपानराव तांबे यांच्या मुलांनी सातत्याने शेतीमधील वेगवेगळ्या प्ऱयोगाबाबत अभ्यास केलेला आहे. त्यातून ते शेती उत्पादनात वाढ करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. त्यात डाळिंब, टरबूज व अन्य पिकांसाठी मल्चिंगच्या वापरावर अधिक भर असतो.
डाळिंबाला आच्छादन
तांबे यांनी आठ वर्षापूर्वी अडीच एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केलेली आहे. अडीच एकरावर सुमारे 570 झाडे लावलेली आहेत. सहा वर्षापासून त्याचे उत्पादन देखील मिळत आहे. सुरवातीला एक वर्ष पिकाला मल्चिंग केलेले नव्हते. त्या वर्षी वीस टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. दुसर्या वर्षापासून मल्चिंगचा वापर केल्याने 35 टन उत्पादन मिळाले. तेव्हापासून ते दरवर्षी डाळिंबाला मल्चिंगचा वापर करतात. सुरवातीला डाळिंबाची जानेवारी महिन्यात साधारण 15 ते 20 तारखे दरम्याण डाळिंब बागेची छाटणी करुन बहार धरत, मात्र बाजारातील मागणीचा आणि दराचा विचार करून चार वर्षापासून 20 फेब्रुवारीला छाटणी करतात. मल्चिंगचा वापर केल्यामुळे डाळिंबात तण वाढत नाही, परिणाम खुरपणीचा खर्च वाचतो, शिवाय पाण्याचा ओलावा टिकून राहतो आणि उत्पादनातही वाढ होत आहे.
टरबूज पिकासाठी मल्चिंग
सोपानराव तांबे पाच वर्षापासून दरवर्षी टरबुजाचे उत्पादन घेतात. त्यासाठी नियमितपणे मल्चिंगचा वापर करतात. यंदा त्यांनी नुकतीच दोन एकरावर शुगर क्विन टरबुजाची लागवड केली आहे. मल्चिंग करण्याआधी ते बेड करून खते देतात.
कांद्याचे बिजोत्पादन
तांबे दरवर्षी कांद्याची लागवड करतात. यंदाही त्यांनी चार एकरावर कांद्याची लागवड केलेली आहे. कांदा लागवड करण्यासाठी दरवर्षी कांद्याचे बिजोत्पादन करतात. यंदा त्यांनी पंधरा गुंठे क्षेत्रावर कांद्याचे बिजोत्पादनासाठी पुणा फुरसुंगी वाणाचे उत्पादन घेत आहे. कांदा लागवडीसाठी घरीच कांदा बिजोत्पादन घेतल्यामुळे दर्जेदार बियाणे आणि त्यापासून चांगली रोपे तयार होतात असे अतुल तांबे यांनी सांगितले.
संरक्षित पाण्यासाठी शेततलाव
तांबेवाडी भागात कालव्याचे पाणी मिळते. मात्र उन्हाळ्यात अथवा गरजेच्या वेळी पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाच्या मदतीने दोन वर्षापूर्वी 28 गुंठे क्षेत्रावर शेततलाव केलेला आहे. त्याचा वापर ते उन्हाळ्यात डाळिंब, टरबुज व अन्य पिकांसाठी करतात. सर्व क्षेत्राला पाणी देण्यासाठी ते ठिंबक, तुषार सिंचनचा वापर करत आहेत. कांद्यालाही तुषार सिंचनाचा वापर करतात.
गायींचे संगोपन
तांबे यांचा सेंद्रिय उत्पादनावरही भर असतो. साधारण 40 टक्के रासायनिक व 60 टक्के सेंद्रिय खतांचा वापर करतात. यासाठी गोमुत्राचीही स्लरी करतात. त्यासाठी तांबे गावराण गायींचे संगोपन करतात. त्यांच्याकडे दूध व्यवसायासाठी पाच संकरीत गायी आहेत. जनावराच्या चार्यासाठी पंधरा गुंठे क्षेत्रावर घासाची लागवड केलेली आहे.
प्रतिक्रिया
मल्चिंगमुळे पिकाला फायदा
आम्ही शेतात डाळिंब, टरबुज, कांद्याचे सातत्याने उत्पादन घेतो. संरक्षित पाण्यासाठी शेततलाव केलेला आहे. मात्र आम्ही डाळिंब, टरबुजासाठी मल्चिंगचा वापर करतो. त्याचा आम्हाला चांगला फायदा झालेला असून उत्पादनात वाढ झालेली आहे. पिकांसाठी नाशिकच्या मुसळगाव एमआयडीसी मधील अॅग्रोवल कंपनीतून मल्चिंग पेपर खरेदी करतो.
- अतुल सोपानराव तांबे
मो.नं. 9527441517