पुणे : शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे, तसेच उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करणे आता काळाची गरज आहे. काळानुरूप शेतकऱ्याने देखील पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आम्ही तयार आहोत, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. दिशा कृषी उन्नतीची 2029 या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडामंच येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार बापूसाहेब पाठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र प्रस्तुगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कृषी संचालक रफिक नाईकवडी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, मराठा चेंबरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्हाट्सअप चॅनलच्या क्यूआर कोड व सेवा दूत ॲपचे उद्घाटन देखील करण्यात आले. याप्रसंगी अनेक संस्थांबरोबर सामंजस्य करार देखील करण्यात आला.
राज्यशासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – अजित पवार
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने व पुणेवा ओळखून त्यावर वैज्ञानिक व व्यावहारिक उपाययोजनांचा पंचवार्षिक आराखडा तयार केला असून पन्नास कोटीची तरतूद देखील केली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधीबाबतही विचार करण्यात येईल. शासनाने एक रुपयात विमा योजना सुरू केली होती. त्याचा अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला असला तरी या योजनेचा गैरफायदा देखील घेतला गेला आहे. त्यामुळे योजनेत बदल करून शेतकऱ्यांना देखील योग्य ती समज दिली जाणार आहे. बदलते हवामान, दुष्काळ, घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत. तरीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी खचू नये राज्यशासन वाऱ्यावर सोडणार नाही, असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु – माणिकराव कोकाटे
यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, सर्व विभागातील शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी आदींची संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊन अनेकविध प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्याची सध्याची कृषी निर्यात 100 कोटी वरून 50 हजार कोटींवर कशी जाईल. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. अधिकाधिक तरुण शेतीकडे वळायला हवा. कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असून एक ॲप देखील तयार केले आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
1 जूनपासून शेतीत तंत्रज्ञान राबवण्यात येईल – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
दिशा कृषी उन्नतीची 2029 हा पंचवार्षिक आराखडा राबविला असून जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत व उत्पादनात वाढ, निर्यात साखळी तयार करणे असे उद्दिष्ट आहे. येत्या एक ते तीन जून दरम्यान ॲग्री हॅकेथॉन राबवण्यात येणार असून येणारे तंत्रज्ञान एक जूनपासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबवण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या उद्योग संघटना कंपन्या व महाराष्ट्र बँक आदी संस्थांशी सामंजस्य करार देखील करण्यात आला. यावेळी अनेक प्रयोगाशील शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇