यावर्षी सलग दुसऱ्यांदा दोन चक्रीवादळाचा धोका; २०१९ अस्मानी संकटाचे वर्ष!
१२५ वर्षातील सर्वात जास्त चक्रीवादळ २०१९ मध्ये
यावर्षी बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात मिळून मागील १२५ वर्षातील सर्वात जास्त चक्रीवादळ निर्माण होण्याचा नवीन विक्रम नोंदविला जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याने काल वर्तविलेला अंदाज खरा ठरल्यास २०१९ वर्ष संपतानाच वर्षातील एकूण वादळांची संख्या १२ पर्यंत गेलेली असेल यातील ७ वादळे ही अरबी समुद्रात तयार झाली आहे. प्रथमच एकाच वर्षात २ वादळे सुद्धा या वर्षी तयार झाली आहे. यावर्षी वायू,हिक्का,महा,कियार,पाबुक,फनी,बुलबुल यासारख्या प्रमुख वादळांची निर्मिती झाली आहे. यावर्षी मान्सूननंतर वादळांची संख्या वाढल्याने याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीवर झाला आहे.
दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही परिस्थिती दुर्मिळच
मुंबई पासून अवघ्या ६४० किमीवर अरबी समुद्रात ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांमध्ये उद्या पाऊसाची शक्यता आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अगोदर ‘क्यार’ या चक्रीवादळाने अरबी समुद्रात ज्याप्रमाणे स्थिती निर्माण केली होती, त्याचप्रमाणे सध्या समुद्रात स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होणं ही दुर्मिळ परिस्थिती मानली जाते.
अम्फन चक्रीवादळ हे पूर्व-मध्य अरबी समुद्रात येण्याची शक्यता आहे, या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. तर, पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते अगोदर उत्तर पश्चिम आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान राज्यात दि.५ व ६ डिसेंबरला या वादळांचा धोका असून या काळात वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ७० किमी इतका राहील. त्याचप्रमाणे काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या येऊ घातलेल्या थंडीत घट होण्याची शक्यता आहे.
यावर्षी वादळांची संख्या वाढण्याचे कारण
समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने वादळांची निर्मिती होते. यंदा समुद्रात सर्वाधिक चक्रीवादळ तयार होण्याच्या मागील कारण म्हणजे समुद्रातील पाण्याचे वाढलेले तापमान आहे. समुद्राचे तापमान २७ अंक सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्याने गरम हवा आकाशात जावून कमी दाबाचे क्षेत्र तायर होण्यास मदत होते. आणि अशा पोषक परीस्थितीत चक्रीवादळाची निर्मिती होते.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी.
शेतकरी वर्गाने आपला खरीपाचा तयार असलेला परंतु काढणी न केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवून जनावरांचा चारा देखील योग्य ठिकाणी ठेवावा. ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकावर परिणाम होणार असून वेळोवेळी पिकांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात. पाऊस झाल्यास शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. खरीपातील तूर पिकावर याचा थेट प्रभाव होणार असल्याने फुलगळ टाळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करावी.