मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सरकारकडून शेतीच्या खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. याबाबत सरकारकडून परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे. यामुळे शेतजमीन खरेदी किंवा विक्री करायचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. काय आहेत हे नियम माहिती करून घेऊ या…
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. मागील काही वर्षांत जमिनीचे दर आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. लोक जमिनीचे प्लॉटिंग करून मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत.
२० गुंठ्यांच्या आतील खरेदी- विक्री बंद
राज्य सरकारने आदेश देऊनही खरेदी- विक्री केली जाते
परंतु, महसूल अधिनियमांच्या तरतुदीनुसार २० गुंठ्यांच्या आतील खरेदी- विक्री बंद आहे. तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे २० गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन खरेदी विक्री करता येत नाही. हा नियम असतानाही २० गुंठ्यापेक्षा कमी जमिनीचे खरेदी – विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त नोंदणीही होत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे राज्य सरकारने या बाबतीत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने एक आदेश जारी केला. त्यात राज्यातील सर्व जिल्हा दुय्यम निबंधकांना तीन सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा दुय्यम निबंधकांना तीन सूचना
सूचना क्रमांक १
समजा तुमच्या नावावर एक एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील तुम्ही १० गुंठे किंवा त्याही पेक्षा कमी जमीन विकत असाल तर त्याची आता खरेदी आणि विक्री होणार नाही. त्याचा दस्त नोंद होणार नाही. यामुळे तुमच्या नावावर ती होणार नाही. पण तुम्ही तो प्लॉट ले आऊट करून यात एक दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी आणि प्राधिकरण विभागाची मंजुरी घेतल्यास हे प्लॉट विक्री करण्यास तुम्हाला परवानगी आहे. हा प्लॉट कलेक्टरांकडून एनए केला असेल तर तुम्ही एक दोन गुंठ्यांचा प्लॉट विकू शकता.
सूचना क्रमांक २
तुम्ही यापूर्वी २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन खरेदी केली असेल आणि व्यवहारासाठी सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली नसेल तर ती घेणे आवश्यक आहे.
आपल्याकडे जमिनीचे तीन प्रकार पडतात यामध्ये वरकस जमीन, जिरायत जमीन आणि बागायत जमीन असे प्रकार पडतात, यामध्ये वरकस जमिनीला २० गुंठ्यांच्यावर खरेदी करण्यास परवानगी आहे. कोरडवाहू किंवा जिरायत जमीन पावसाच्या पाण्यावर शेती होत असणारी जमीन. याप्रकारच्या जमिनीचे क्षेत्र १५ गुंठे ठरवण्यात आले आहे. बागायत जमीन क्षेत्र २० गुंठे, तर कॅनॉल (पाट) बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र १० गुंठे निश्चित करण्यात आले आहे.
सूचना क्रमांक ३
एखादा वेगळा किंवा स्वतंत्र निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित करण्यात आलेल्या असतात. किंवा त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल, अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. पण, जर अशा तुकड्याचं विभाजन करणार असाल तर मात्र त्याला वरील अटी व शर्ती लागू राहतील. त्यामुळे तुम्ही जर शेतजमीन खरेदी करणार असाल, तर हे नवे बदल लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यायला हवा.
नमस्कार
शेतजमीन एन.ए न करताच कलेक्टर नी ४ गुंठे शेतजमीन ची खरेदी करण्यासाठी परमीशन दिली आहे.त्यासाठी ५ वर्षांत एन.ए करण्याच्या अटीवर असा शेरा आहे. यासाठी कलेक्टर नी कोणत्या कायद्याच्या आधार घेतला आहे.