चिंतामण पाटील/जळगांव
खान्देशच्या काळया कसदार आणि सपाट जमिनीवर पोसलेल्या केळीला आपल्या लाल मातीत रुजविण्याची किमया कोकणच्या एका तरुणाने करून दाखविली आहे. तब्बल 10 एकर क्षेत्रावर g9 जातीच्या वाणाची लागवड करण्याचे धाडस रायगड जिल्ह्यातील वायाळ येथील प्रमोद पवार याने केले आहे.
खालापूर तालुक्यातील वायाळ हे छोटेसे गाव. महाराष्ट्रातील इतर विभागाप्रमाणे कोकणातही शेती म्हणजे न परवडणारा धंदा अशी भावना रुजू लागली आहे. असे असूनही कोकणातल्या परंपरागत शेतीला फाटा देत नव्या पद्धतीने शेतीची मांडणी आणि स्वतःचे मार्केटिंग तंत्र वापरून शेतीत पाय रोवण्याची हिंमत प्रमोद पवार याने दाखविली आहे.
कोकण म्हटले की डोंगर उताराची जमीन. भात खाचराचा तसेच आंबे, काजू, फणस, नारळबागांचा प्रदेश असे दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. ते खरंही आहे. रायगड जिल्ह्याची ओळख तर भात शेतीसाठीच आहे. मुंबई- ठाणे या औद्योगिक महानगराला लागून हा जिल्हा असल्याने शेत जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जमिनी विकून पैसा करून घ्यायचा व थोडे फार शिक्षण असले की खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करायची असा सर्रास पायंडा आता या भागात पडला आहे. सिंचनासाठी पाणी हे एकमेव शास्वत साधन वगळता कोकणातील शेती सुद्धा महाराष्ट्रातील इतर क्षेत्राप्रमाणेच शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर आणि मजुरीचे वाढते दर यामुळे आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. परिणामी कोकणातही नवी पिढी आता शेती करण्याचे धाडस करीत नाही असे दृश्य आहे.
वायाळचा प्रमोद मात्र त्याला अपवाद आहे. शेती क्षेत्रात अवतीभवती नैराश्याचे वातावरण असतांना वडिलांच्या अकाली निधनानंतर तो 2009 पासून शेतीत उतरला. घरात आई आणि मोठा भाऊ. भाऊ कंपनीत नोकरीला. वडिलोपार्जित 4 एकर व भाडेतत्त्वावर 15 एकर शेती तो कसू लागला. मोठा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य होतेच.
हळद लागवडीला केली सुरुवात
पावसाळ्यात भात आणि पुढे हिवाळ्यात भेंडी, वांगी, मिरची अशी भाजीपाला पिकांची लागवड अशीच परंपरागत पद्धत प्रमोदनेही अवलंबली. दरम्यान कोकणात हळदीचे उत्पादन घेता येऊ शकते असे लक्षात आल्यानंतर त्याने 2015 – 16 च्या हंगामात हळदीची लागवड केली. सुरुवातीचा बेसल डोस वगळता सेंद्रीय खतांचा वापर केला. पवार यांचा गांडूळ खत वापरावर अधिक भर आहे. त्यामुळे हळदीचे हळकुंडे उत्तम गुणवत्तेची आली.
एकरी 10 टन ओल्या हळदीचे उत्पादन निघाले. पंचायत समितीच्या कृषी विभागाने सहकार्य केल्याने हळद शिजविण्यासाठी बॉयलर कुकर मिळाल्याने हळद सुकवून, स्वतःच पावडर तयार करून विक्री सुरू केली. बाजारात 200 किलो दर असतांना उत्कृष्ट गुणवत्तेमुळे प्रमोद पवारच्या हळदीला 300 रुपये किलो असा दर मिळू लागला.
ग्रँड नाईन केळी लागवड:
एकदा पंचायत समितीने निवडक शेतकऱ्यांना ग्रँड नाईन जातीची केळीची टिश्यूकल्चर रोपे लागवडीसाठी पुरविली. त्यात प्रमोद पवार याने 500 रोपे लागवडीची तयारी दर्शविली. g9 चा हा या भागातला पहिलाच प्रयोग. उंच वाढणारी, आखूड घड असलेली कोकणातील गावरान केळीची फार फार तर पाच दहा गुंठ्यावर लागवड व्हायची. या 500 रोपांच्या उत्पादनामुळे मात्र चमत्कार घडला. 5– 7 गुंठे वरून पुढच्या वर्षी 10 एकर क्षेत्रावर लागवड गेली. 500 रोपांचा चांगला अनुभव आल्यानंतर प्रमोद आणि त्याच्या इतर शेतकरी मित्रांनी जळगाव गाठले. केळीच्या काही बागा पहिल्या व केली उत्पादनाचे तंत्र समजून घेतले. जैन उद्योग समूहाला भेट देऊन ठिबक सिंचन प्रणाली बद्दल जाणून घेतले. जमिनीचा पोत आणि वातावरणानुसार फेर बदल करून आपल्या शेतात लागवडीचा निर्णय प्रमोद याने घेतला. मार्च 2020 मध्ये 10 एकर क्षेत्रावर केळी लागवड केली.
खत, पाण्याचे बिनचूक व्यवस्थापन:
मोरबे धरण असल्याने कालव्याला बारमाही पाणी असते. कालव्यावर मोटरपंप बसवून शेतात पाणी आणले आहे. कोकणात भरपूर पाऊसमान असल्याने त्यादृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. संपूर्ण बागेला ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. ठिबक सिंचन यंत्रणेमुळे खत व्यवस्थापन सोपे झाले. गरजेनुसार पिकाला विद्राव्य खते दिली जातात.
सरासरी 35 किलो वजनाचा घड :
मार्च ते जानेवारी ह्या नऊ महिन्याच्या कालखंडात उत्कृष्ट व्यवस्थापन ठेवल्याने घडाचे पोषण चांगले झाल्याने घडाला 30 ते 45 किलो असे वजन मिळाले आहे. प्रमोद पवार याने मोठ्या क्षेत्रावर केलेली लागवड फायदेशीर ठरली असून खर्च वजा जाता एकरी 1 लाख 20 हजार रुपये उत्पन्न येत आहे.
प्रशिक्षण :
पवार यांनी आपल्या शेतीत पीक बदल करण्यापूर्वी जळगाव येथे जैन उद्योग समूहाच्या ठिबक संच आणि टिश्यू कल्चर युनिटला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. तेथील शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांकडून तंत्र समजून घेतले. नागपूर येथे 15 दिवसाचे “ ऑरगॅनिक फार्मिंग “ चे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.शेती कशी केली म्हणजे तिच्यातून समृद्धी येते हे अनुभवायचे तर प्रमोद पवारला भेटले पाहिजे. शेती सोडून नोकरीचा मार्ग धरणाऱ्या अनेक तरुणांसमोर प्रमोद हे एक उत्तम उदाहरण आहे.
हळद आणि केळीची स्वतः च करतो विक्री:
कोकणातील शेतकऱ्यांच्या बांधावराची जांभळे खरेदी करून ती पुण्याच्या मार्केट यार्डात विकण्यापासून शेतमाल विकायला प्रमोद शिकला. पुण्याच्या मार्केट यार्डात त्याच्या जांभळाची व्यापारी वाट पाहायचे. तेथून तो शेतमाल विक्रीचे कौशल्य शिकला आणि आपल्या शेतातील माल अडते आणि व्यापाऱ्यांना न विकता तो स्वतःच विकु लागला. हळद पावडर घरीच तयार करून विक्री सुरू केली. त्यानुसार 4 एकर शेतात उत्पादीत होणारी संपूर्ण हळदीचे तो घरच्या घरी विक्री करतो. बाजारभावापेक्षा दीडपट जास्त दर त्याच्या हळदीला मिळतो.
हळदी प्रमाणे केळी विकण्यासाठी तो स्वतःच बाहेर पडला. या भागात मोठमोठे उद्योग असल्याने तेथील कॅन्टीन चालकांना दररोज पिकवकेली केळी पोहचविण्यास सुरुवात केली. त्यानुसार या भागातील 10 – 12 कंपन्यांमध्ये त्याच्या केळीला मागणी आहे.
उत्पादनावर न थांबता मी सुरुवातीपासूनच आपला माल स्वतःच विकायला शिकलो. जांभुळ विक्रीतून सुरुवात केली आणि आता केळी विक्रीपर्यंत आलो आहे. मी उत्पादन काढत असलेली केळी स्वतःच विकतो. ती मलाच विकायला कमी पडते, त्यामुळे व्यापाऱ्याला विकण्याचा प्रश्नच नाही. आपण पिकावायचं आणि व्यापाऱ्याला विकायचं हे थांबलं तरच शेती परवडते.
-
प्रमोद गोविंद पवार, मु. वायाळ पो. वाशिवली ता. खालापूर जि. रायगड.
-
पिन 410206