बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बटाटा लागवडीपासून आधुनिक लागवडीची पद्धती, बियाणेप्रक्रिया, तणनियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पीकसंरक्षण या बाबींचा विचार करण्याची आवश्यकता असते. बटाटा शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना पुढीलप्रमाणे बाबीचा विचार करावा.

लागवडीसाठी उपयुक्त बाबी:-
बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि ट्युबरलायझेनच्या वेळी (बटाटा पिकास काळ) विशेष तापमानाची गरज असते. बटाटा लागवड करतांना रात्रीचे तापमान १८-२०0c च्या खाली असणे महत्वाचे असते. साधारणतः ही वेळ १५-३० नोव्हेंबरच्या वेळेस असते. या वेळेस लागवड करण्यासाठी हिताचे ठरते. जेणेकरून वाढीसाठी २० ते २४ डिग्री सेल्सिअस आणि टयुबरलायझन साठी १८ ते २० डिग्री सेल्सिअस तापमान उपलब्ध असेल.
बटाटा लागवड करतांना बियाणे निवड आणि बियाणे प्रक्रिया आणि महत्वाच्या बाबी
बटाटा कंदाची साठवण कोल्ड स्टोरेज मध्ये केलेली असल्या कारणास्तव लागवड करण्यासाठी बटाटा कोल्ड स्टोरेज मधून कमीत कमी एक आठवडा बाहेर काढून ठेवावा साधारणतः २५ ते ४० ग्राम वजनाचा बटाटा कंद वापरणे लागवडीसाठी हिताचे असते परंतु २५ ते ४० ग्राम वजनाचा बटाटा कंद नसल्यास कंद आकाराने तसेच वजनाने मोठा कंदाचे दोन अथवा चार आकारानुसार किंवा वजनानुसार समान भागामध्ये कापणी करावी. कापणी केल्यानंतर हवेतील रोगापासून संरक्षण करण्यासाठी लागवडीपूर्वी कंद एक किलो मॅन्कोझेब + ४ ते ५ किलो राख यांच्या मिश्रणाबरोबर सुकी प्रक्रिया करून घ्यावी. बटाटा पिकांमध्ये स्कॅब या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बटाटा कंद लागवडीपूर्वी ३ टक्के बोरिक अॅसिड ( ३० ग्राम प्रति लिटर पाणी ) द्रावणात अर्ध्या तासासाठी बुडवनी करावी. रासायनिक घटकांची प्रक्रिया केल्यानंतर आठ तासानंतर बटाटा पिकांमध्ये नत्रयुक्त घटकांच्या पूर्तीसाठी २.५ किलो अझोटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रव्यरूप असिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यामधून मिश्रण करून अर्ध्या तासासाठी बीज प्रक्रिया करावी
बटाटा पिकांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन:-
बटाटा पिकाच्या किफायतशीर उत्पादनासाठी जमीन तयार करतांना २५ ते ३० टन शेणखताची अथवा १ ते २ टन एरंडी पेंड किंवा ३ टन कोंबडीखत यापैकी जे उपलब्ध असेल याचा वापर करावा. बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी विद्राव्य खतांची ठिबक पद्धतीने मात्रा दिल्यास खताची मात्रा बचत होऊन उत्पादनात देखील वाढ होते. आता बटाटा संशोधन केंद्र डीसा सरदार कृषी नगर दांतीवाडा कृषिविदयापीठ शिफारसीनुसार २२० किलो नत्र , ११० किलो स्फुरद , २२० किलो पालाश प्रति हेक्टर ठिबक पद्धतीतून दयावेत पूर्ण नत्र आणि पालाश बटाटा लागवडीनंतर ९ दिवसांनी ६३ दिवसांपर्यंत ७ दिवसांच्या अंतराने ठिबक मधून दयावे ( समान ९ वेळेस ) तसेच स्फुरद पायाभूत स्वरूपात दयावेत. जर ठिबक सिंचन उपलब्ध नसेल तर महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी च्या शिफारशीनुसार बटाटा लागवडीपूर्वी १०० किलो नत्र , ६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रति हेक्टरी दयावे ५० किलो नत्र भर लावतांना दयावे (३० ते ४० दिवसानंतर ) खतांची मात्रा परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते.
पाणी व्यवस्थापन:-
ठिबक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास प्रति तासासाठी चार लिटर पाणी बाहेर पडत असलेल्या ड्रीपरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच दोन लिटर मधील अंतर दोन फुट ठेवणे आवश्यक असते. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये तापमान फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी असते म्हणून दिवसासाठी या महिन्यादरम्यान ४५ मिनिट ठिबक चालू ठेवावे तसेच फेब्रुवारी महिन्यात ६० मिनिटे ड्रिप चालू ठेवावे . ठिबक पद्धतीची उपलब्धता नसल्यास माध्यम काळी पोयटायुक्त जमीन असल्यास ८० ते ९० दिवसाच्या अंतराने एकूण आठ ते दहा पाण्याची जरुरी असते. परंतु जमीनीत रेती मिश्रित कणांची मात्रा जास्त असल्यास पाच ते सात दिवसाच्या अंतराने एकूण १४ ते १५ पाण्याची गरज असते जास्त पाणी साठल्यास मुळांची कूज होऊन बुरशीनाशक रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो.
तण नियंत्रण :-
बटाटा पिकामध्ये तणनियंत्रणासाठी खुरपणी करणे, वखरणी करणे सोयीस्कर नसते कारण ३० ते ४० दिवसांनी बटाटा कंदाची वाढ आणि विकास अवस्था सुरु होते म्हणून बटाटा लागवड केल्यानंतर बटाटा उगवण्यापूर्वी प्रति एक लिटर पाण्यातून मेट्रीक्युसीन ७० टक्के WP एक ग्रामची फवारणी करावी. तणनाशकाची फवारणी करतांना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.

पीक संरक्षण
बटाटा पिकांमध्ये रसशोषक किडी,पाने खाणारी अळी तसेच स्पोडोप्टेरा अळी इ. किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
रस शोषक किडींचे नियंत्रण
रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी बटाटा मुख्य पिकाच्या बॉर्डरवर मका पिकाची लागवड करावी. जेणेकरून या पिकाचा सापळा पिकासारखा उपयोग होऊ शकतो. बटाटा पिकांमधील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ४० चिकट सापळे (स्टिकी ट्रॅप) लावावेत. लागवडीनंतर महिन्याच्या अंतराने निंबोळी तेल ५ मिली प्रति लिटर पाणी तसेच गोमूत्र (एक लिटर प्रति नऊ लिटर पाण्यासाठी) फवारणी करत राहावे. रासायनिक नियंत्रण इमिडाक्लोप्रिड १७. ८ एस. एल. ०.५ मिली प्रति लिटर पाणी. पाने खाणारी अळी स्पोडोप्टर अळी नियंत्रण. रात्रभर गवताचे ढीग पिकात ठेवून सकाळी अळ्यांसह नष्ट करावेत. ४ ते ५ पक्षि थांबे प्रति एकरी करावेत. ५ ट्रायकोकार्ड प्रति हेक्टरीसाठी वापरावे. रासायनिक नियंत्रण २० मिली क्विनॉलफॉस १० लिटर पाण्यामधून आलटून पालटून फवारणी करावी.
रोग नियंत्रण:-
बटाटामध्ये स्कॅब लवकर तसेच उशिरा येणारा करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.
स्कॅब नियंत्रण :-
बिजप्रक्रिया :- ३ टक्के बोरिक अॅसिड (३० ग्राम प्रति लिटर पाणी) अर्धातास कंदाची बुडवनी करावी. ठिबक पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करावे एकाच जमिनीमध्ये वारंवार बटाटा पीक घेऊ नये.
करपा नियंत्रण :-
पिकांची फेरपालट करावी. बटाटा पिकाच्या काढणीनंतर खोल नांगरणी करून जमीन तापवून दयावी.
बियाणे प्रक्रिया :-
मॅन्कोझेब १ किलो + ५ किलो राखेचे मिश्रण करून सुकी प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा व्हिरीडी प्रति हेक्टर ५ किलो लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतामधून दयावी
रासायनिक नियंत्रण:-
मॅन्कोझेब ३० ग्राम + ३० ग्राम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यातून २ ते ३ वेळा फवारणी करावी. रोगांचे लक्षणे दिसण्याच्या त्रीवतेवरून फवारणी मात्रा निश्चित करावी किंवा ५ टक्के हेक्साकोनॅझोन ०. ५ ग्राम प्रति लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.

डॉ. मुठाळ के. एम. सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविदया विभाग, कृषि महाविदयालय, सोनई,
डॉ. साबळे पी. ए. सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविदया विभाग, सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषिविद्यापीठ, गुजरात,
श्री. लिपणे आर. आर. सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविदया विभाग, कृषि महाविदयालय, सोनई, संपर्क.-८४०८०३५७७२ /७८७५२५७७७०.
















खुप छान माहिती आहे.. सर्व शेकऱ्यांना उपयोगी अशी…
सर्व शेतकरी वर्गा तर्फे अग्रो वर्ल्ड चे खूप खूप धन्यवाद….