मुंबई (प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणे व किटकनाशके मिळायला हवी. उत्पादक कंपन्यानी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची हवी. बी-बियाणे व किटकनाशकांची विक्री होत असताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्या मार्फत तयार होणारी उत्पादने यांचे ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित करण्यात येत असून यासाठी ई-निरीक्षण (ई- मॉनिटरिंग) प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी सहसचिव गणेश पाटील, कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे तसेच महाआयटीचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत श्री. दादाजी भुसे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक औषधी दुकानात औषधी साठ्याची माहिती ठेवली जाते, त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या बी-बियाणे व कीटकनाशके यांचे ट्रॅकिंग करण्यात येणार. यासाठी महाआयटी कडून ई-इन्व्हेंटरी, ई-इन्स्पेक्टर आणि ई-लॅब असे 3 वेगवेगळे अँप्लिकेशन तयार करण्यात येणार असून ही तिन्ही अँप्लिकेशन एकमेकांशी जोडलेली असतील. या ई-लॅब प्रणालीमुळे उत्पादक कंपन्यांमध्ये तयार झालेले उत्पादन शेतकऱ्यां पर्यंत व्यवस्थित पोहोच होत असल्याची खातरजमा होणार आहे. कृषी विक्री केंद्रातून किती शेतकऱ्यांना कोणते बियाणे, किटक नाशके दिली गेली यांचे अहवाल तयार होणार…. यामुळे काळाबाजारीस आळा बसणार असल्याचे मत श्री. दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.

राज्यात महाआयटीने सुरू केलेले ई-परवाना हे अप्लिकेशन सद्या पूर्ण राज्यभर वापरण्यात येत असून याचा चांगला फायदा होत असल्याचे मंत्रीमहोदयांनी या बैठकीत सांगितले.
















