कृषी प्रदर्शनाला दोन दिवसात ६० हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी
जळगाव, ता. १६ (प्रतिनिधी)ः अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील शेतकरी व कृषी संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १७ कृषीऋषीचा कार्यक्रमाचे अध्यक्ष रतनलालजी बाफना यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला व हाताळायला मिळत आहे, त्यामुळे त्यांचा नक्कीच आत्मविश्वास दुणावला आहे. शेती हा आज खऱ्या अर्थाने मुख्य अर्थार्जनाचा स्रोत आहे. अॅग्रोवर्ल्डच्या या प्रदर्शनामुळे उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही पूर्वीच्या काळी असणारी म्हण आज सार्थ होताना दिसत आहे.
जिल्हा कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी, नाबार्डचे जिल्हा प्रमुख श्रीकांत झांबरे, प्लांन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, नंदिनीबाई जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य सी. एस. पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती. येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्डच्या पहिल्या दोन दिवसात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनाचा सोमवारी ( ता. 18) समारोप आहे. नाबार्डचे श्रीकांत झांबरे व शेतकरी संघटनेचे कडू अप्पा पाटील, तेलबिया संशोधन केंद्रचे वरिष्ठ संशोधक डॉ.मधुकर बेडिस व इतर मान्यवरांनी संबोधित केले. यावेळी औरंगाबाद, बीड, नांदेड येथून शेतकरी पुरस्कारासाठी हजर होते.
पुरस्कार्थी शेतकरी –
शेतकरी संघटनेतील कार्यासाठी कडू अप्पा पाटील(किनगांव ता.यावल) , डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर (जळगांव), डॉ महेश महाजन (कृषी विज्ञान केंद्र पाल ता.यावल), प्रमोद बर्हाटे (परेश कृषी पर्यंटन केंद्र कंडारी ता.जि.जळगांव), गुणवंत सोनवणे (ता.चाळीसगाव), निलेश राणे(ता.पारोळा), समाधान रतन पाटील (आव्हाने ता.जि.जळगांव), संघरत्न शालीग्राम गायकवाड (एरंडोल), लीलाधर पाटील(मालखेडा ता.चोपडा), समाधान भिकन पाटील (किनगांव ता.यावल जि.जळगांव), मधुकर नारायण पाटील(सुनसगांव ता.जामनेर), मयुर अरुण वाघ(बाबरूड राणीचे ता.पाचोरा), जगन्नाथ रामभाऊ दिवाण(भाट अंतरवाली ता. गेवराई जि. बीड), मारोतराव व्यंकटराव पाटील(प्रयाग नगर,सिंधी ता.उमरी जि.नांदेड), आर.ए.पाटील(चोपडा), दिनेश पाटील(पातोंडा ता.अमळनेर), डॉ.मधुकर बेडिस(तेलबिया संशोधन केंद्र जळगांव), आदींचा गौरव या वेळी करण्यात आला.
भारतातील सर्वात मोठा बैल’ गजा’ प्रदर्शनात दाखल
भरतील सर्वात मोठा बैल अशी ख्याती असणारा कसबेडिग्रज येथील कृष्णा यशवंत साईमोते यांचा ‘गजा’ हा बैल काल रात्री उशिरा शहरात दाखल झाल्यामुळे आज त्याला पाहण्यासाठी नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी झाली आहे. दररोज ५०० रु खर्च असणार हा बैल १ टन वजनाचा असून त्याची लांबी १० फुट आहे व उंची ६ फुट आहे. खास वातानुकुलीत गोठ्यात राहणाऱ्या गजाची लवकरच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेलल्या या भारतातील सर्वात मोठ्या बैलाला पाहण्यासाठी आज शेतकरी बांधवांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.
उद्या दि.१७ रोजी दुपारी १२.०० वाजता कृषी क्षेत्रासंबंधित उद्योगपती व अधिकारी यांचा गौरव सोहळा होणार आहे. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.