औरंगाबाद पोलिस आयुक्तलयातून सहाय्यक आयुक्त म्हणून दिगंबर गाडेकर हे सेवानिवृत्त झाले. तसे मुळचे ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे. ते औरंगाबाद येथेच स्थायिक झाले आहेत. 25 वर्षांपूर्वी त्यांनी सांवगी औरंगाबाद जवळील कृष्णापूरवाडी येथे 25 एकर अगदी माळरान, पडीक हलकी शेती विकत घेतली होती. याच शेतीत आज त्यांनी आधुनिक पद्धतीने ढोबळी मिरची, निर्यातक्षम शेवंती, पेरू, डाळिंब आदी उत्पादन घेतले आहे.
औरंगाबाद शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर कृष्णापूरवाडी डोंगरालगतचे हे छोटेसे गाव. महामार्गालगत असल्याने येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. आसपास लोकवस्ती वाढत असल्याने त्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले. गाडेकर यांनी या जमिनीचा इतर व्यावसायिक विचार न करता येथे शेतीच करण्याचे ठरवले. 20 वर्षे पडीक गायरान जमीन असल्याने तेथे अतिक्रमण झाले होते. प्रथम त्यांनी ते यशस्वीपणे व कोणावरही अन्याय न होऊ देता काढले. प्रथम जमीन सर्व झाडे झुडपे काढून व्यवस्थित सपाटीकरण केली. संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण केले.
पाण्याचा शोध पूर्ण
शेती करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. येथे सुरवातीला पिण्यासाठीही पाणी नव्हते. साधारणपणे मे मध्ये निवृत्त झाल्यावर गाडेकर यांनी पाण्याचा शोध सुरू केला. जवळच सावंगी तलाव आहे. तेथे विहिरीसाठी जमीन घेतली. साधारणपणे 40 बाय 50 फूट विहीर शंभर फूट खोल आहे. या विहिरीवरून 4 इंच पाईपलाईन 3 किलोमीटर केली आहे. तलावात उन्हाळ्यात पाणी कमी होते. परंतु अडचण नको म्हणून दोन शेततळ्यांची निर्मिती केली. यामध्ये प्रत्येकी अडीच कोटी लिटर पाणीसाठा होतो. त्यांची लांबी रुंदी 125 बाय 225 मीटर असून, खोली 46 फूट आहे. सोबतच 3 बोेअरवेल घेतले असून त्याचे पाणी व विहिरीचे उपलब्ध पाणी यामधून शेततळे भरण्यात येते. विशेष म्हणजे पावसाळ्यात पॉलीहाऊसचे पाणी वाया न जाऊ देता ते सर्व शेततळ्यात घेण्यात येते. यामुळे 18 फूट शेततळे या पाण्याने भरले. पाण्याची उपलब्धता झाल्यावर त्यांनी नाविन्यपूर्ण पीक पद्धती निवडली.
ठिबक सिंचनावर फळबाग
ठिबक सिंचनावर 3 एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली असून, 5 एकर डाळिंबाची लागवड केली आहे. त्याचे उत्पन्न सध्या सुरू होत असून, यावरही दिगंबर गाडेकर यांचे समाधान झाले नाही. आधुनिक आणि हायटेक शेती करण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. त्यांनी यासाठी शेतकर्यांना भेटी दिल्या. विविध माध्यमातून शेडनेट आणि पॉलिहाऊस यांची माहिती घेतली. बाजारपेठ, पीकपद्धती खर्च, उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी सिमला मिरची (ढोबळी मिरची) आणि शेवंती फूल पिकाची निवड केली.
भांडवल उभारणी
आधुनिक शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. गाडेकर यांच्यासमोरही भांडवलाचा प्रश्न उभार राहिला, तेव्हा त्यांनी भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन असे सर्व मिळून 50 लाख रुपये यासाठी खर्च करण्याचे ठरविले. शेतीसाठी परिवाराचा थोडा विरोध झाला. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. विहीर व पाईपलाईनसाठी यासाठी 17 लाख रुपये खर्च आला. जमीन मोजणी, अतिक्रमण काढणे, जमीन सपाटीकरण व कुंपण यासाठी 20 लाख रुपये खर्च झाले. शेततळे व पॉलिहाऊस शेडनेटसाठी पुन्हा खर्च समोर आला. त्यांनी अनेक बँकांकडे कर्जासाठी प्रयत्न केले. परंतु, ते सेवानिवृत्त झाल्यामुळे काही बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. शेवटी त्यांचे प्रयत्न पाहून सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांना नॅशनल हार्टिकल्चर बोर्ड मार्फत एक कोटीचे कर्ज मंजूर केले. दोन वर्षापासून त्यांनी पॉलिहाऊस व शेडनेटची उभारणी केली असून, 50 टक्के सबसिडी अनुदान त्यांना यासाठी मिळणार आहे. वादळाचा अथवा गारपीट यांचा या शेडनेट, पॉलिहाऊसचे नुकसान भरपाईसाठी 35 हजार भरून रुपये विमा देखील काढला आहे.
मुलगा शेतीकडे वळला
एकरी 18 लाख रुपये उत्पन्न शेतीमधून मिळू शकते हे पाहून पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेला त्यांचा मुलगा अभिजितने नोकरीचा राजीनामा दिला आणि आता ते वडील दिगंबर गाडेकर यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कामात मदत करीत आहेत. आगामी काळात या शेतीला कृषी पर्यटन केंद्राचे स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे.
कमवा व शिका
शेतीकामासाठी गाडेकर यांच्याकडे एक सालगडी असून हंगामी मजूर असतात. औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण येतात. त्यांना राहण्याची सोय आणि पैशांची देखील आवश्यकता असते. अशा विद्यार्थांना गाडेकर यांच्या शेतीत काम केल्यास योग्य पैसे आणि राहण्याची व्यवस्था देखील केली जाते.
निर्यातक्षम शेवंती उत्पादन
दोन एकरातील पॉलिहाऊसमध्ये दोन भाग करून एक्स्पोर्ट क्वॉलिटीच्या पांढर्या शेवंती फुलांची त्यात लागवड केली आहे. स्वित्झर्लंडमधील डेनझर आणि आर्रिक क्वीन या जातीची ही फुले आहेत. या फुलासाठी ठरावीक कालावधीत प्रकाश आणि अंधारात ठेवावे लागते. त्यासाठी काळे पॉलीथीन कव्हर आणि 27 वॅटचे 180 एलईडी बल्ब लावण्यात आले आहेत. सतत एक महिना रोपांना 20 तास बल्बचा प्रकाश द्यावा लागतो. त्यानंतर एक महिना सलग काळ्या कापडाने रोपांना झाकून 20 तास अंधार द्यावा लागतो. या नियोजनामुळे यावर्षी भरपूर उत्पादनाची अपेक्षा आहे. सरासरी एका काडीचा दर 10 ते 12 रुपये असतो. 10 फुलांचा बंच तयार करून तो हैद्राबाद, पुणे, मुंबई, बंगरूळ या मोठ्या शहरात विकला जातो. चांगला भाव असल्यास 13 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल, असा त्यांना विश्वास आहे.
शेडनेटमध्ये सिमला मिरची
शेवंती फुलाच्या पॉलिहाऊसच्या बाजूला एक एकरातील शेडनेटमध्ये सिमला मिरचीचे पीक आहे. गत वर्षी लाल व पिवळ्या मिरचीची लागवड होती. त्याचा अधिक खर्च असल्याने यावर्षी हिरव्या सिमला मिरचीचे पीक यंदा घेतले आहे. यावर्षी 95 टन माल निघण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेत 25 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळतो. 30 रुपये भाव मिळाल्यास मिरचीच्या 27 लाख रुपयांची कमाई होऊ शकेल, असा विश्वास गाडेकर यांना आहे.
पाण्याचा काटेकोर वापर
गाडेकर यांच्या शेतीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे पाण्याचा अगदी योग्य आणि काटेकोरपणे वापर केलेला आहे. या पिकांना नियमित प्रोग्रामनुसार पाणी देण्यात येते. फवारणीसाठी फॉगर्सचा वापर केला आहे. वीज नियमित राहावी म्हणून स्वतंत्र एक रोहित्र बसवले आहे. मिरची व शेवंती फुलाला पाणी देण्यासाठी त्यांच्या ठराविक वेळा सेट केल्या आहेत. अॅटोमशनमुळे 4.30 वाजता आपोआप बेडवरील ठिबक पाईप सुरू होतात. बरोबर 45 मिनिटाला बंद होतात, असे दोन्ही शेडमध्ये अर्धा तास पाणी दिले जाते. 4 कोटी लिटरच्या दोन शेततळ्यामधील सरासरी दिवसाआड 10 हजार लिटर पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर होतो. सध्या एक शेततळे पूर्ण भरून ठेवले आहे. यामुळे दुष्काळातही पाण्याची कमतरता भासत नाही.
आर्थिक ताळेबंद
दिगंबर गाडेकर यांनी निवृत्तीनंतर हाती आलेले 52 लाख रुपये आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 1 कोटी रुपये कर्ज, अशी दिड कोटीची गुंतवणूक दोन वर्षापूर्वी शेतीसाठी केली. अर्थात हे सर्व उभे करण्यासाठी आणि उत्पन्न सुरू होण्यासाठी त्यांना 4 ते 5 वर्षे लागली. आता मात्र ते ढोबळी मिरचीचे एकरी 18 लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. शेवंती फुलांचे उत्पन्न मार्चमध्ये सुरू होईल. फुलाचे 20 लाख रुपये, पेरू, सिताफळ आणि डाळींब याचेही 25 लाख पर्यंत उत्पन्न मिळू शकते, असे 77 लाख रुपयांपर्यंत सरासरी उत्पन्न त्यांनी गृहीत धरले आहे. मजूरी, खते, औषधी, वाहतूक, बँकेचे व्याज असा मिळून त्यांचा 26 लाख रुपये खर्च झाला. मागील वर्षी त्यांना 18 लाख रुपयाची रंगीत ढोबळी मिरची झाली होती. त्याचा सर्व खर्च 9 लाख रुपये झाला होता. बँक हप्ता वजा जाता 25 लाखातून 15 लाख उरले होते. सर्व खर्च गृहीत धरून वर्षाला त्यांना दोन एकरमधून 35 ते 36 लाख रुपये यावर्षी मिळतील, अशी आशा आहे.
तरुणांनो आधुनिक पद्धतीने शेती करा!
शेतकर्यांनी इतर दुसर्या पिकांपेक्षा 10 गुंठे शेडनेट किंवा पॉलिहाऊस करावे. जमिनीला रासायनिक सवय झाली आहे. ती हळुहळू कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि कमीत कमी 30 टक्के रासायनिक आणि 70 टक्के सेंद्रिय शेती करावी. सध्या तीव्र दुष्काळातही आपण उत्पन्न घेऊ शकतो, याचे समाधान आहे. नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करून कमी वेळात, कमी पाण्यात आणि कमी जागेत उत्पादन घेऊ शकतो. सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शासकीय योजनांचा फायदा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती व्यवसायात परिश्रम केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते व बेकारीवर मात करता येऊ शकेल. दिगंबर गाडेकर
कृष्णापूर वाडी,
ता.जि. औरंगाबाद,
मो.नं. 9929109498